आयपीएल 2021 मध्ये नुकत्याच पार पडलेल्या मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स मधील सामन्यात मुंबई इंडियन्सने थरारक विजय मिळवला. 219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स एक वेळ संकटात सापडले होते, मात्र मुंबईचा उपकर्णधार कायरन पोलार्डच्या वादळी खेळीमुळे मुंबईला लक्ष्य गाठणे शक्य झाले. पोलार्डच्या या खेळी दरम्यान चेन्नई संघाच्या काही रणनीती बद्दल क्रिकेट पंडितांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यातील महत्त्वाची बाब म्हणजे शेवटच्या चेंडूंवर 2 धावांची गरज असताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ऑन साईडमधील सर्वच खेळाडू थेट सीमारेषेवर ठेवले होते. त्यामुळे पोलार्डला 2 धावा पळून घेणे सहज शक्य झाले. सामना संपल्यानंतर चेन्नईच्या या रणनीतीचा खुलासा स्वतः मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केला आहे.
सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फ्लेमिंग म्हणाले, “मी क्षेत्ररक्षणाची रचना बघून अजिबातही आश्चर्यचकित झालो नाही. पोलार्ड फारच शानदार फॉर्ममध्ये होता व त्यामुळे अशा परिस्थितीत तो काय करेल याचा तुम्ही काहीही अंदाज बांधू शकत नाही. खरे सांगायचे तर आम्हाला वाटले होते की 2019 मधील सामन्याप्रमाणे शेवटच्या चेंडूवर खेळाडू धावबाद होईल. तसेच शेवटच्या चेंडू प्रमाणे अशा अनेक बाबी आहेत, ज्यावर आम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे.”
दरम्यान सामन्याचा विचार केला असता मोईन अली, अंबाती रायडू व फाफ डू प्लेसिसच्या शानदार अर्धशतकीय खेळीच्या बळावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 4 बाद 218 धावांची डोंगरा एवढी धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. मात्र कायरन पोलार्डच्या वादळी खेळीने चेन्नईच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले व मुंबईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. पोलार्डला 87 धावांची खेळी व गोलंदाजीत मिळवलेल्या 2 बळींबद्दल सामनावीराचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरविरुद्ध निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळणार आरसीबी, कारण वाचून कराल कौतुक