मागील काही महिन्यांपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघातून चायनामन गोलंदाज कुलदिप यादव आणि युजवेंद्र चहलने जबरदस्त गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.
तसेच सध्या इंग्लंड दौऱ्यातही कुलदिपच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागत आहे. त्याने या दौऱ्यात आत्तापर्यंत 2 टी20 आणि 1 वनडेत मिळून 11 विकेट्स घेतल्या आहेत.
यात त्याने गुरुवारी 12 जुलैला झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडेत 25 धावा देत 6 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.
या सामन्यानंतर बोलताना विराटने कुलदिप आणि चहलचा कसोटी क्रिकेटसाठीही विचार केला जाऊ शकतो याचे संकेत दिले आहेत.
विराट म्हणाला, “कसोटी संघाची निवड करताना काहिही होऊ शकते. कदाचीत काही आश्चर्यकारक निवडीही होऊ शकतात. कुलदिप आणि चहलने स्वत:ला चांगला पर्याय म्हणून समोर आणले आहे. इंग्लंडचे फलंदाज त्यांच्यासमोर संघर्ष करताना दिसत आहेत.”
“जेव्हा कसोटी क्रिकेट असते तेव्हा परिणमकारक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची गरज असते. जेव्हा पासून हे दोन रिस्ट स्पिनर्स संघात आले आहेत, तेव्हापासून ते चांगली कामगिरी करत आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही मधल्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती. ते आमची मुख्य ताकद आहेत.”
कुलदिपने याआधी भारताकडून 2 कसोटी सामने खेळले आहेत. यातही त्याने 9 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र अजून चहलने कसोटी पदार्पण केलेले नाही.
त्याचबरोबर कुलदिप आणि चहल हे यावर्षाच्या सुरवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज ठरले होते.
पुढे कोहली म्हणाला सध्या पुढच्या दोन वनडे जिंकणे हे आमचे लक्ष्य आहे. दुसरा वनडे सामना 14 जुलैला लंडनमध्ये लॉर्ड्सच्या मैदानात होणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
तसेच इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका 1 आॅगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेत 5 कसोटी सामने होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–फेडररला पराभूत करणारा खेळाडूला एबी डिव्हीलियर्सने केले होते टेनिसमध्ये पराभूत
–भारताचा महान फलंदाज मोहम्मद कैफ सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त