भारत हा देश विविधतांनी भरलेला आहे. याच भारत देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातही तितकीच विविधता पाहायला मिळते. एक वेळ होती जेव्हा फक्त मुंबई, बेंगलोर, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या महानगरांतून आलेले क्रिकेटपटूच राष्ट्रीय संघात जागा मिळवू शकत असायचे. परंतु पुढे कालांतराने भारतातील छोटछोट्या खेड्यापाड्यांमधून क्रिकेटपटू घडू लागले आणि राष्ट्रीय संघात आपला दावा ठोकू लागले. यातीलच एक नाव म्हणजे, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याचे.
भारतीय संघात जागा मिळवल्यानंतर कैफने भरपूर प्रसिद्धी मिळवली. परंतु तो अजूनही तो लहानाचा मोठा झालेल्या शहराला विसरलेला नाही. नुकतेच त्याने आपल्या जन्मस्थळाला भेट दिली (Mohammad Kaif Visits Allahabad) असून येथील आठवणींना पुन्हा पाहून तो भावुक (Mohammad Kaif Gets Emotional) झाला आहे.
कैफ हा मूळ उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद अर्थातच प्रयागराज शहराचा राहणारा आहे. सोमवारी (२० डिसेंबर) त्याने आपले मूळ शहर अलाहाबादला भेट दिली असून यादरम्यानचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जिथे कैफचा जन्म झाला, जिथे तो लहानाचा मोठा झाला, जिथून त्याला क्रिकेटचे बाळकडू मिळाले, अशा ठिकाणाला पुन्हा भेट देऊन तो आनंदी झाल्याचेही पाहायला मिळाले. तिथे त्याने आपल्या जवळच्या लोकांची भेटही घेतली आहे. अलाहाबादच्या गल्लीत फेरफटका मारतानाचे फोटो सोशल मीडियावर त्याने शेअर केले आहेत.
या फोटोंसोबत त्याने लिहिले आहे की, ‘तीच गल्ली, तेच लोक, तेच प्रेम. अलाहाबादच्या किडगंजमधील माझ्या जुन्या घराकडचा प्रवास. याच गल्लीने मला क्रिकेट, आयुष्य आणि नातेसंबंधांना जाणून घ्यायला शिकवले आहे.’ त्याला आपल्या जुन्या आठवणीत भावुक झाल्याचे पाहून चाहतेही भावनिक प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
https://twitter.com/MohammadKaif/status/1472871051507863552?s=20
कैफच्या क्रिकेट कारकिर्दीवर प्रकाश टाकायचा झाल्यास, त्याने रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेशचा संघ पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचा विजेता बनला होता. त्याला इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड या ऐतिहासिक मैदानावरील नेटवेस्ट सीरिज (NatWest Series) अंतिम सामन्यातील विजयाचा नायक म्हणून ओळखले जाते. त्याने या सामन्यात वैयक्तिक ८७ धावा चोपल्या होत्या. याबरोबरच अष्टपैलू युवराज सिंगसोबत मिळून १२१ धावांची भागिदारीही रचली होती.
कैफच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने २००० सालचा १९ वर्षांखालील विश्वचषकही जिंकला होता. २०१८ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतर आता तो क्रिकेट समालोचनात काम करतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान क्रिकेट पुन्हा बदनाम! प्रमुख खेळाडूवर अल्पवयीन मुलीने लावले लैंगिक शोषणाचे आरोप
पीवायसी-पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग २०२१ स्पर्धेत आर्यन स्कायलार्कस संघाला विजेतेपद






