सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात दुसरा टी २० सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.
रोहित आज शून्य धावेवर बाद झाला. आंतराष्ट्रीय टी २० मध्ये शून्यवर बाद होण्याची रोहितची ही चौथी वेळ होती. त्यामुळे त्याने भारताकडून आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक वेळा शून्य धावेवर बाद होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
याआधी हा विक्रम माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आणि अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण नावावर होता. हे दोघेही प्रत्येकी ३ वेळा आंतराष्ट्रीय टी २० मध्ये बाद झाले आहेत.
रोहित आजपर्यंत ५४ सामन्यात खेळला असून त्याने २ शतके आणि ७ अर्धशतकांसह २४.३१ च्या सरासरीने १३१३ धावा केल्या आहेत.
रोहितसाठी हा संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौरा अपयशी ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचव्या वनडे सामन्यात शतक केले होते. हे शतक सोडले तर रोहितला बाकी सामन्यांमध्ये चमक दाखवता आलेली नाही.
आज भारताची सुरुवात खराब झाली होती. पहिले पूर्ण षटक भारतासाठी निर्धाव गेले. त्यानंतर एकापाठोपाठ एक भारताने विकेट्स गमावल्याने. भारताची अवस्था १०.४ षटकात ४ बाद ९० धावा अशी झाली. सध्या मनीष पांडे आणि एम एस धोनी नाबाद खेळात आहेत.






