कोलंबो। काल आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारतीय संघाने तिरंगी टी २० मालिकेत बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात केली. सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताचे निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद निश्चित केले.
या विजयाबरोबरच भारताने आंतराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये एक खास विक्रम रचला आहे.
भारताचा कालचा विजय हा आंतराष्ट्रीय टी २० मधील ६१ वा विजय होता. त्यामुळे भारताने आता आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले आहे.
या यादीत प्रथम क्रमांकावर पाकिस्तान असून त्यांनी त्यांनी आजपर्यंत ७४ आंतराष्ट्रीय टी २० सामने जिंकले आहेत. तसेच भारताने ६१ तर तिसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेने ६० विजय मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या खालोखाल चौथ्या क्रमांकावर ५४ विजयांसह न्यूझीलंड आणि श्रीलंका हे संघ आहेत.
आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ:
७४ – पाकिस्तान
६१– भारत
६० – दक्षिण आफ्रिका
५४ – न्यूझीलंड आणि श्रीलंका





