महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या साखळी फेरीची अखेर जवळ आलेली आहे. साखळी फेरीतील मोजके सामने शिल्लक असताना, आतापर्यंत केवळ दोन संघांना प्ले ऑफ्समध्ये आपला प्रवेश निश्चित करता आला आहे. पहिल्या दोन हंगामाचे विजेतेपद पटकावलेल्या रत्नागिरी जेट्स संघाची पूर्ण मदार काही अंशी त्यांच्या व बहुतांशी नशिबाच्या हातात आहे.
स्पर्धेतील केवळ पाच साखळी सामने शिल्लक असताना, रत्नागिरी जेट्स सर्वात मागे राहिलेला संघ म्हणून दिसून येतो. गुणतालिकेत ते पाचव्या स्थानी असले तरी, साखळी फेरीच्या अखेरीस त्यांना सहाव्या स्थानावर देखील समाधान मानावे लागू शकते. त्यांनी आतापर्यंत स्पर्धेत नऊ सामने खेळताना केवळ दोन विजय मिळवले आहेत. तर, दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. या कारणाने त्यांच्या खात्यावर सहा गुण जमा आहेत. आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी विजय मिळवल्यास ते जास्तीत जास्त आठ गुणांपर्यंत पोहोचू शकतात.
सध्या ईगल नाशिक टायटन्स आणि पुणेरी बाप्पा हेच संघ प्ले ऑफ्समध्ये दाखल झाले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावरील रायगड रॉयल्सचे 9 गुण आहेत. त्यामुळे रत्नागिरी जेट्सला चौथ्या क्रमांकावर साखळी फेरी संपवायची असेल तर, ईगल नाशिक टायटन्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल. तसेच, पीबीजी कोल्हापूर टस्कर्सने आपले उर्वरित दोन्ही सामने व सातारा वॉरियर्सने कमीत कमी एक सामना हरण्याची प्रार्थना त्यांना करावी लागेल. त्यानंतरच रत्नागिरी जेट्स प्ले ऑफ्समध्ये दाखल होऊ शकतात. रत्नागिरी संघाच्या जमेची बाजू म्हणजे त्यांची धावगती अधिक मध्ये आहे.
पहिल्या दोन हंगामाचे विजेतेपद मिळवल्यानंतर, रत्नागिरी विजेतेपदाच्या हॅट्रिकच्या इराद्याने स्पर्धेत उतरली होती. मात्र, पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने, त्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी दोन विजय संपादन केले. त्यानंतर मात्र पुन्हा दोन पराभव व दोन सामने पावसाने वाया गेल्यामुळे संघाला निराशा पत्करावी लागलेली.