मुंबई । कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी यांनी भारताला अनेक मोठे यश दिले आहे. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून दोघांनीही भारतीय संघाला एका मोठय़ा उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळेच आज त्यांचे जगभर चाहते निर्माण झाले आहेत. खेळाच्या दुनियेत राज कारणारे हे दोन्ही खेळाडू अभ्यासात मात्र जेमतेम होते.
धोनीने पित्याच्या दबावामुळे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तर कोहली शाळा सोडून देण्याचा विचार होता, तरीही त्याने अखेर बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अभ्यास आणि क्रिकेट यांचा ताळमेळ धोनी कसा घालायचा याची माहिती 2016 साली ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ धोनीवर आलेल्या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. धोनीने शिक्षण घ्यावे यासाठी त्याचे वडील आग्रही होते. तो दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये 66 टक्के गुण मिळवून पास झाला तर बारावीच्या परीक्षेत त्याने 56 टक्के गुण मिळवले.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा गणित विषयाशी छत्तीसचा आकडा होता. क्रिकेटवर प्रेम असलेल्या कोहलीला अभ्यासात रस नव्हता. मागील वर्षी त्याने एका मुलाखतीत सांगितले की,” गणित या विषयांमध्ये त्याला दहा गुणाचा आकडा देखील पार करता येत नव्हता. गणितातल्या क्लृप्त्या त्याला समजत नसायच्या. गणित हा विषय खूपच अवघड जायचा. कसेबसे तो गणितात सरासरी गुण मिळवत दहावी पास झाला.
भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचे देखील शिक्षण कोहली आणि धोनी प्रमाणे कमी झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सचिन दहावी अनुत्तीर्ण आहे. क्रिकेटवर जास्त लक्ष केंद्रित केल्याने तो फेल झाला. त्यामुळे त्याने परत कधीच परीक्षा दिली नाही.