सोमवारी (२८ डिसेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) साल २०११-२०२० या दशकातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार जाहीर केले आहेत. यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला सर्वोत्तम खेळाडूवृत्तीचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार त्याला २०११ च्या नॉटिंगघम कसोटीत धाबबाद झालेल्या इयान बेलला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावण्याबद्दल मिळाला आहे.
काय आहे नक्की ही घटना ?
सन २०११ ला भारत विरुद्ध इंग्लंड संघात ट्रेंट ब्रिजला झालेल्या कसोटी सामन्यात धोनीने धावबाद झालेल्या इयान बेलला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले होते.
झाले असे की इंग्लंडच्या दुसऱ्या डावात इयान बेल १३७ धावांवर होता. त्यावेळी ओएन मॉर्गनने ६६ व्या षटकाचा शेवटचा चेंडू डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक केला. तिथे प्रविण कुमार क्षेत्ररक्षण करत होता. त्याने तो चेंडू चौकार जाण्यापासून आडवला होता. पण त्यावेळी मॉर्गन आणि बेल चौकार गेला असे समजून टी ब्रेकसाठी ड्रेसिंग रुमकडे जाण्यास निघाले, पण तो चेंडू चौकार गेला नव्हता.
त्यावेळी अभिनव मुकुंदने चेंडू घेत स्टंपवरील बेल्स उडवल्या आणि बेल धावबाद झाल्याचे अपिल केले. पंचांनी रिप्ले तपासले त्यावेळी चेंडूने बाऊंड्री लाईन पार केली नसल्याचे दिसले आणि त्यामुळे बेल बाद झाला. त्यावेळी पंचांनी धोनीला बादचा निर्णय मागे घेणार का असे विचारले होते, पण धोनी नाही म्हणाला.
मात्र त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी धोनीला धावबादचे अपिल मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी धोनीने संघातील खेळाडूंशी चर्चा करुन बेलविरुद्धचे धावबादचे अपिल मागे घेत त्याला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले. त्यावेळी भारतीय संघासाठी सर्वांनी टाळ्या वाजवत त्यांचे पुन्हा मैदानात स्वागत केले. त्यावर्षीचा आयसीसीचा खिलाडूवृत्तीचा पुरस्कारही धोनीला मिळाला होता.
https://twitter.com/ICC/status/1333418505979518981
https://twitter.com/ICC/status/1343479003668217856
त्या कसोटी सामन्यात भारताला ३१९ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्या सामन्यात बेलने नंतर पुन्हा फलंदाजीला येत १५९ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
एलिसा पेरीचाच डंका! एक-दोन नव्हे तर जिंकलेत आयसीसीचे ‘हे’ तिन्ही मोठे पुरस्कार
कसोटीत स्टीव्ह स्मिथच भारी! दिग्गजांना पछाडत जिंकला आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार






