भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने नुकतेच विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत मोठे विधान केले. गौतम गंभीरने विराट कोहलीच्या वनडे आणि कसोटी सामन्यातील कर्णधारपदाबद्दल आपण कधीही प्रश्न उपस्थित केले नाही असे स्पष्ट केले. मात्र त्याचवेळी कोहलीची टी-२० सामन्यातील कामगिरी आपल्याला पसंत नसल्याचेही तो म्हणाला.
स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवरील ‘गेम प्लॅन’ या कार्यक्रमात बोलताना गंभीरने हे वक्तव्य केले. या कार्यक्रमात त्याला विराट कोहलीचे नेतृत्व आणि त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात जिंकलेली मालिका याबाबत प्रश्न विचारल्या गेले होते. त्यावर उत्तर देताना ‘मी नेहमी कोहलीच्या टी-२० सामन्यातील नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते, मात्र कसोटी आणि वनडेतील त्याच्या नेतृत्वाबाबत मला कोणतीही तक्रार नाही’, असे गंभीरने सांगितले. भारताने कोहलीच्या नेतृत्वात कसोटीत अप्रतिम कामगिरी केली आहे आणि हाच सिलसिला ते कायम राखतील, याची मला खात्री आहे, असेही यावेळी गंभीर म्हणाला.
“ऑस्ट्रेलियातील विजयाने विराटही आनंदी असेल”
यावर बोलताना गंभीर पुढे म्हणाला, “भारतीय संघ एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून नाही आणि हे स्वत: विराट कोहलीने देखील वारंवार सांगितले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात मिळालेल्या मालिका विजयाने त्यालाही अतिशय आनंद झाला असेल. हा संघ उभा करण्यासाठी त्याने देखील मेहनत घेतली आहे.”
दरम्यान येत्या ५ फेब्रुवारीपासून भारतीय संघ मायदेशात इंग्लंडशी दोन हात करणार आहे. या मालिकेद्वारे विराट कोहली नव्या दमाने मैदानावर पुनरागमन करेल, असा विश्वास यावेळी गंभीरने व्यक्त केला. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना नुकतेच कन्यारत्न झाल्याने विराट नक्कीच आनंदी असेल, आणि ताजातवाना होऊन मैदानावर परतेल, असेही गंभीर म्हणाला.
महत्वाच्या बातम्या:
आयपीएलमध्ये जर मला संधी मिळाली, तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेन
टॉप ४ : भारतात पदार्पण केलेले इंग्लंडचे खेळाडू, ज्यांना पुढे दिग्गज म्हणून ओळखले गेले