मिताली राजच्या नेतृत्वात ज्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वचषक खेळायचा आहे; त्याच मैदानावर विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाची बिकट अवस्था झाली आहे. विश्वचषकापूर्वी, न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला सलग चार पराभवांना सामोरे जावे लागले आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील ४ सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघ एकही सामना जिंकू शकलेला नाही. विश्वचषकासाठी संभाव्य विजेते म्हणून गेलेल्या भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे. मालिकेतील अखेरच्या सामन्यात विजय मिळवून क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल.
चौथ्या वनडेत पावसाचा खेळ
क्वीन्सटाऊन येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या वनडेत पावसाने बाधा आणली. उभय संघांमधील चौथा एकदिवसीय सामना प्रत्येकी २० षटकांचा टी२० सामन्याच्या शैलीत खेळला गेला. पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय महिलांचा ६३ धावांनी दारुण पराभव केला.
न्यूझीलंडचा धावांचा डोंगर
या सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १९१ धावा केल्या. हा सामना एकदिवसीय स्वरूपाचा होता. मात्र, जो पावसामुळे २० षटकांचा केला गेला होता. न्यूझीलंडकडून एमेलिया केरने ३३ चेंडूत ६८ धावा केल्या. तर, एमी सेडरवेटने १६ चेंडूत ३२ आणि सुझी बेट्सने २६ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याच वेळी, रेणुका सिंग दोन बळी घेत भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. त्यांच्याशिवाय दीप्ती, मेघना आणि राजेश्वरीने प्रत्येकी एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.
फलंदाजांचा फ्लॉप शो
भारतीय महिला संघासमोर १९२ धावांचे लक्ष्य होते. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघ्या १९ धावांत वरच्या फळीतील चार फलंदाज गमावले. मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोषने वेगवान खेळी खेळताना २८ चेंडूत ५२ धावा केल्या. मात्र, तिचे प्रयत्न अपुरे पडले. भारतीय महिला संघाच्या ४ फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. तर, ८ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठणे कठीण झाले. न्यूझीलंडकडून हेली जॅन्सनने सर्वाधिक ३ बळी घेतले. अखेरच्या सामन्यात भारतीय संघ विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल.
महत्वाच्या बातम्या-
वाद तापल्यानंतर अखेर साहाने घेतली माघार! ‘त्या’ पत्रकाराविषयी म्हणाला… (mahasports.in)
ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावून फसले आयपीएल संघ; वाचा सविस्तर (mahasports.in)