सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 5 सामन्यांची टी20 मालिका 4-1ने जिंकली. या मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (दि. 3 डिसेंबर) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअवर पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 धावांनी विजय मिळवला. 5व्या टी20 सामन्यात रोमांचक विजय मिळवून देणारा पठ्ठ्या म्हणजे अर्शदीप सिंग होय. विजयानंतर अर्शदीपने सांगितले की, अखेरच्या षटकापूर्वी त्याची कर्णधार सूर्यासोबत काय चर्चा झाली होती.
खरं तर, ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात विजय मिळवण्यासाठी 10 धावांची गरज होती. अशात कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्यावर विश्वास ठेवत त्याला अखेरचे षटक टाकण्यासाठी पाठवले. विशेष म्हणजे, त्याने पहिल्या 3 षटकात 37 धावा खर्च केल्या होत्या. भारतीय संघ या सामन्यात 5 गोलंदाजांसोबत उतरला होता. अशात सूर्याकडे शेवटचे षटक अर्शदीपला देण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. मात्र, सूर्याने या षटकापूर्वी अर्शदीपचा आत्मविश्वास चांगलाच वाढवला.
काय म्हणाला अर्शदीप?
सामन्यानंतर अर्शदीप सिंग म्हणाला, “मी विचार करत होतो की, मी खूप जास्त धावा (पहिल्या 3 षटकात) दिल्या आहेत. मी आणखी एका अपेक्षा करत होतो. देवाच्या कृपेने, मी याचा बचाव केला आणि स्टाफलाही धन्यवाद की, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. सूर्या (अंतिम षटकापूर्वी) मला म्हणाला की, जे होईल, ते होईल… आणि याचे श्रेय फलंदाजांनाही जाते. आमच्याकडे 15-20 धावा अधिक होत्या आणि निश्चितरीत्या ही अधिक धावसंख्या होती.”
भारतीय संघाने या मालिकेतील आधीच 3-1ने आघाडी घेतली होती. अशात सूर्यकुमार अखेरच्या षटकात आपल्या गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवण्याचा काम करत होता. जर भारताने 5वा टी20 सामना गमावला असता, तरीही भारताने मालिका 3-2ने जिंकली असती. त्यामुळे सूर्याने अखेरच्या षटकात अर्शदीपला मोकळेपणाने गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला.
अर्शदीप सिंग या मालिकेतील आपल्या प्रदर्शनावर जास्त खुश दिसला नाही. तो म्हणाला की, “ज्याप्रकारचा स्तर आम्ही भारतीय संघात तयार केला आहे, त्याप्रकारचे त्याचे प्रदर्शन नव्हते.” मात्र, त्याने असेही म्हटले की, त्याच्याकडे शिकण्यासाठी भरपूर काही बाकी आहे आणि तो चांगले पुनरागमन करेल.
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारताने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. यावेळी भारताने श्रेयस अय्यर याच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 160 धावा केल्या. अय्यरने 37 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 53 धावा केल्या. तसेच, अक्षर पटेलने 7व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 31 धावांचे योगदान दिले.
भारताचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 8 विकेट्स गमावत 154 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 6 धावांनी खिशात घातला. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना मुकेश कुमार चमकला. त्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त अक्षर पटेलने 4 षटकात 14 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. (pacer arshdeep singh revealed the secret told what was the conversation with suryakumar yadav before the last over indvsaus)
हेही वाचा-
मालिका खिशात घालताच गगनात मावेनासा झाला सूर्याचा आनंद, म्हणाला, ‘आम्हाला निर्भीडच व्हायचं होतं…’
फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! अखेरच्या सामन्यात सूर्याच्या सेनेचा 6 धावांनी विजय, मालिका 4-1ने खिशात