टी20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी सर्व 20 संघ सज्ज झाले आहेत. दरम्यान, बांगलादेशने आपले नाव मागे घेतले असून, त्यांच्या जागी आयसीसीने (ICC) स्कॉटलंडला स्थान दिले आहे. मात्र, पाकिस्तानने या निर्णयाचा विरोध करत टी20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी न होण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षांनी विश्वचषकात सहभागी होण्याचा निर्णय सरकारवर सोपवला आहे. मात्र, आता यावर एक मोठी अपडेट समोर आली आहे.
’टेलीकॉम एशिया स्पोर्ट’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषकातील सहभागाबाबत अनिश्चितता असतानाही, पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियन संघासोबत लाहोरहून ‘एअर लंका’च्या विमानाने कोलंबोसाठी बुकिंग केले आहे.
याशिवाय, मोहसीन नकवी यांनी पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी आणि रमीज राजा यांची भेट घेण्यापूर्वी राष्ट्रपती आसिफ झरदारी यांचा सल्ला घेतला होता. सूत्रांनी पुढे सांगितले की, या दोन्ही माजी प्रमुखांनी संघाला श्रीलंकेला पाठवण्याचे समर्थन केले आणि भारतांविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार न टाकण्याचा सल्लाही दिला.
पीसीबी प्रमुख मोहसीन नकवी यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, विश्वचषकात पाकिस्तानच्या सहभागाचा निर्णय सरकार घेईल. आम्ही सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. (26 जानेवारी) रोजी नकवी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेतली होती. मात्र, पाकिस्तान विश्वचषकात सहभागी होणार की बांगलादेशची बाजू घेत माघार घेणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेच्या भूमीवर खेळणार आहे. (14 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. मात्र, यापूर्वी अशी बातमी होती की पाकिस्तान भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकू शकतो.






