इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर सुरू आहे. मात्र या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाची पहिल्या २ दिवसांतच दयनीय अवस्था केली. इंग्लंडच्या गोलंदाज तसेच फलंदाजांनी देखील या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले. यामुळे इंग्लंड संघ या सामन्यात भक्कम स्थितीत आहे. अनेकांनी भारतीय संघावर ओढावलेल्या या स्थितीसाठी कर्णधार विराट कोहलीचा प्रथम फलंदाजीचा निर्णय जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इंजमाम उल हक यांनी देखील कोहलीला त्याच्या या निर्णयामुळे फटकारले आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात पहिल्यांदाच नाणेफेक जिंकली होती. यावर कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात कोहलीचा हा निर्णय चुकल्याचे देखील स्पष्ट झाले, ज्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला केवळ ७८ धावांवर बाद केले. त्यामुळे कोहलीच्या या निर्णयावर भरपूर टीका केली जात आहे.
याबद्दल पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, “हा तोच इंग्लंडचा संघ आहे, ज्याला तुम्ही काही दिवसांपूर्वी पराभूत केले होते. लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या डावात तुम्ही कोरड्या खेळपट्टीवर देखील दमदार खेळी केली होती. इंग्लिश फलंदाजांवर तुम्ही चांगलेच वर्चस्व गाजवले होते. अशावेळी तुम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी निवडून पुन्हा इंग्लिश खेळाडूंना दबावात टाकू शकला असता. मी हे म्हणत नाही की, इंग्लंडचा संघ देखील ७८ धावांवर सर्वबाद झाला असता. मात्र त्यांनी एवढी मोठी धावसंख्या उभी केली नसती.”
तसेच पुढे बोलताना इंजमाम म्हणाले, “भारताचे फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव बनवू शकले नाही. एक क्रिकेटपटू म्हणून खेळपट्टी कशीही असो, परंतु तुम्ही २५-३० चेंडू खेळता तेव्हा तुम्ही सेट होऊन चांगली खेळी करू शकता. यानंतर तुम्हाला जोखीम पत्करावा लागतो. रोहित शर्माने १०५ चेंडू खेळले. मात्र तोदेखील मोठी धावसंख्या करू शकला नाही. विराट कोहली देखील ७ धावा बनवून बाद झाला होता. म्हणून फलंदाजाने जबाबदारी घेऊन शॉट खेळावेत. ”
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी कोहलीचा हा निर्णय सपशेल फेल ठरवला. इंग्लिश गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारतीय संघाला केवळ ७८ धावांवर सर्वबाद केले. नंतर या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडने ४३२ धावा करून ३५४ धावांची आघाडी देखील मिळवली.
महत्वाच्या बातम्या –
–‘ईसीबीला हटवा, कसोटी क्रिकेट वाचवा’; हेडिंग्ले स्टेडियमवर मोठ्या बॅनरसह आकाशात उडताना दिसले विमान
–भारतापुढे अजून १३९ धावांचे लक्ष्य, मग चौथ्या दिवशी काय असेल फलंदाजांची योजना? रोहितने केला खुलासा
–स्टंप्स कुठे? चेंडू कुठे? वादग्रस्त अंपायर्स कॉलमुळे रोहित तंबूत, चाहत्यांसह पत्नी रितीकाही संतप्त