मुंबई । 2019 साली इंग्लंडमध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्याच्या पूर्वी मँचेस्टर येथे एक पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स भारतीय खेळाडूंना शिवीगाळ केल्याची धक्कादायक माहिती भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याने दिली. 29 विजय शंकरचा हा पहिलाच पाकिस्तानविरुद्धचा सामना होता.
विजय शंकर म्हणाला की,” पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक दिवस अगोदर काही खेळाडू कॉफीसाठी बाहेर पडले तेव्हा एक पाकिस्तानी क्रिकेट फॅन आमच्या जवळ आला आणि आम्हाला शिवीगाळ करू लागला. भारत-पाक सामन्याचा लोकांवरती किती परिणाम होतो, याचा पहिल्यांदा अनुभव मला आला. तो क्रिकेट फॅन आम्हाला शिवीगाळ करत त्याचे रेकॉर्डिंग देखील करत होता. आम्ही त्याला प्रतिक्रिया दिली नाही.” भारत आर्मी पॉडकास्टवर बोलताना विजय शंकरने ही माहिती दिली.
या सामन्यात विजयला फलंदाजी करण्यास जास्त संधी मिळाली नाही. डेथ ओव्हर्समध्ये त्याला पंधरा धावा काढण्यात यश आले. मात्र, आपल्या गोलंदाजीने साऱ्यांनाच प्रभावित केले.
भुवनेश्वर कुमारला दुखापत झाल्याने तो या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या ऐवजी विजय शंकरला संधी मिळाली होती. विश्वचषकात त्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर इमाम-उल- हकला बाद केले. त्यानंतर पाकिस्तान कर्णधार सरफराज अहमद यालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने डकवर्थ लुईसच्या नियमांच्या आधारावर भारताने पाकिस्तानला 89 धावांनी हरवले.
शंकर म्हणाला की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मी खूपच दबावामध्ये होतो. मला आराम करावसे वाटत होते. हॉटेलच्या खोलीत बसून आमचे मन लागत नव्हते. त्यानंतर मी आणि दिनेश कार्तिक कॉफी पिण्यासाठी बाहेर पडलो.
2019 च्या विश्वचषकात विजय शंकरला संधी दिल्याने आजी माजी खेळाडूंनी तत्कालीन निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. अंबाती रायडू याला डावलून विजय शंकरला विश्वचषकात संधी देण्यात आली होती.






