मुंबई। भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल सर्वात अनलकी यष्टिरक्षक मानला जातो. वयाच्या सतराव्या वर्षी 2002 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले होते. त्यानंतर सलग दोन वर्ष भारतीय संघाकडून खेळला. मात्र महेंद्रसिंग धोनीचे पदार्पण होताच पार्थिव पटेलला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 2004 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीनंतर त्याला पुन्हा फारशी संधी मिळाली नाही.
पार्थिवने माजी खेळाडू आकाश चोप्रा यांच्याशी बोलताना सांगितले की, “त्या सामन्यानंतर मला टेनिस बॉल खेळताना तो चेंडू व्यवस्थित पकडता येतो की नाही याचीही भीती वाटायची. फॉर्ममध्ये येण्यासाठी मी ज्युनिअर संघातील खेळाडूंबरोबर खेळायचो.”
“अनेक आजी माजी खेळाडूंनी माझ्याविषयी वर्तमानपत्रांमध्ये खूप साऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे मला अधिकच भीती वाटू लागली. त्यांच्या सर्व प्रतिक्रिया मी वाचून काढयचो आणि माझ्या डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला,” असे पार्थिवने नमूद केले.
“मी सोळा वर्षांखालील मुलांसोबत क्रिकेट खेळणे सुरू केले. माझा आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत होतो. मी त्यांच्यासोबत फलंदाजी करायचो. यासोबत यष्टीरक्षणाचा देखील सराव करायचो. त्यानंतर सर्वच काही हळूहळू योग्य मार्गावर आले. भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर मी पुन्हा शून्यातून सुरुवात केली आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे क्रिकेट करण्याचे ठरवले. रणजी क्रिकेट खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करू लागलो,”असे पार्थिव पटेलने सांगितले.
पार्थिवला 2001 साली बॉर्डर-गावसकर स्कॉलरशिपसाठी निवडण्यात आले होते. 2002 साली झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर त्याला भारतीय कसोटी संघात सामील करून घेण्यात आले. त्याने त्याचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध नॉटिंघम येथे खेळला. या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने नाबाद 19 धावा केल्या.





