आयपीएल 2021 च्या 8 व्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने केएल राहुलच्या पंजाब किंग्ज संघाचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 106 धावा केल्या. तर या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने 15.4 षटकांत 6 गडी राखून सामना जिंकला. या विजयासह चेन्नईने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले आहे.
पंजाब संघाच्या झालेल्या पराभवामुळे संघाचा कर्णधार केएल राहुल खूप निराश झाल्याचे दिसले. त्याने सामन्यानंतरच्या सादरीकरणात, “सांगण्यासारखे असे काहीच नाही. कारण पहिल्या सात किंवा आठ षटकांत पाच गडी गमावल्यानंतर कोणत्याही संघाला सामन्यात पुनरागमन करणे अवघड जाते. त्यांनी चांगली गोलंदाजी केली, त्यामध्ये आम्हीही काही खराब फटके खेळलो. परंतु खेळपट्टी जशी दिसत होती त्यापेक्षाही ती खूप वेगळी असून त्यावरती खेळणे अधिक कठीण जात होते. त्यामुळे सीएसकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामध्ये वेगवान गोलंदाज दीपक चहरने खूप चांगली गोलंदाजी केली.” असे तो म्हणाला.
पुढे बोलताना त्याने या पराभवासाठी त्याच्या संघातील फलंदाज जबाबदार असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, “100-110 धावा करण्यासारखे हे मैदान नव्हते. आम्ही कदाचित 150-160 धावा करायला पाहिजे होत्या. परंतु आमच्यासाठी हे चांगले आहे. कारण या चुकांमधून शिकून पुढील सामन्यांमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकतो.”
संघातील गोलंदाजांविषयी बोलताना राहुलने म्हटले की, “आमच्या गोलंदाजीमध्ये आक्रमकता देखील असून आम्ही त्याचा नक्कीच वापर करू इच्छितो. पहिला सामना रिचर्डसन आणि मेरीडिथ यांच्यासाठी फार काही चांगले राहिला नाही. कारण तो त्यांचा सुरूवातीचा सामना होता. त्यामुळे ते थोडे चिंताग्रस्त होते. परंतु या सामन्यात त्यांना मजबूत झाल्याचे पाहून आनंद झाला.”
आपल्या चुकांमधून धडा घेण्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “खेळाआधी आपण ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी बोलतो त्याबद्दल आम्हाला स्वतःचे पुनरावलोकन करायचे आहे. पहिल्या सामन्यात आम्ही 220 धावा केल्या, परंतु या सामन्यात आम्हाला त्यापैकी निम्म्याही धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे आपण आपल्या चुकांमधून शिकणे खूप महत्वाचे आहे. आम्हाला अजूनही निडर क्रिकेट खेळायचे आहे. कारण हे टी-20 क्रिकेट आहे, येथे बर्याचदा आपण मोठी धावसंख्या उभी करू शकत नाही. हंगामात एक किंवा दोन सामने असेही असतील की ज्यामध्ये आपण असे लवकर गडी गमावू. परंतु आपण कठोर परिश्रम करून पुढे चालत राहू.”
महत्त्वाच्या बातम्या-
फुल ऑन एंटरटेनमेंट! लाईव्ह सामन्यात ड्वेन ब्रावोला चढला ‘वाथी फिवर’, व्हिडिओ होतोय व्हायरल
एमएस धोनीची सीएसकेकडून सामन्यांची ‘डबल सेंचूरी’; म्हणाला, आता मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय!
सीएसकेने सामना जिंकला, पण अंबाती रायुडूच्या नावे झाला आयपीएल इतिहासातील नकोसा विक्रम