ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वनडे संघात समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, रोहितच्या हातून वनडे संघाचे नेतृत्व काढून घेण्यात आले आहे. शुबमन गिलला एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आला आहे. हिटमॅनच्या हातून कर्णधारपद गेल्यानंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे की रोहित आणि कोहली हे निवड समितीच्या 2027 च्या वर्ल्ड कपच्या योजनांचा भाग नाहीत का? या सगळ्या अफवांच्या दरम्यान माजी फिरकीपटू आर. अश्विनने कोहली-रोहितबाबत बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे.
अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले, “एका बाजूला निवडीबद्दल चर्चा सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला कोहली-रोहितबद्दल बोललं जातंय. जर तुम्ही संघाची निवड पाहिली, तर लक्षात येईल की निवड समिती भविष्यातील योजनांकडे पाहत आहे. मात्र, तुमच्याकडे असे दोन खेळाडू आहेत जे त्यांच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की या दिग्गज खेळाडूंना ज्या पद्धतीने हाताळलं जातंय, त्यात नक्कीच सुधारणा होण्याची गरज आहे. हे सांगणं खूप सोपं असतं की आता त्यांचं वय झालंय आणि त्यांनी निवृत्ती घ्यावी.”






