पहिल्या आयपीएल मोसमाचा विजेता आणि मागील दोन वर्ष बंदीमुळे आयपीएल न खेळलेला राजस्थान रॉयल्सच्या संघाने बीसीसीआयला संघाचे नाव बदल्यासाठी विनंती केली आहे.
बीसीसीआयच्या एका अधिका-याने सांगितले की, “त्यांनी ही विनंती केली आहे परंतु नाव बदलण्याचे कारण मात्र त्यांनी सांगितले नाही.”
सुप्रीम कोर्टने २०१५ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे २ वर्षासाठी बंदी घातली होती.
रॉयल्स व सुपर किंग्जचे मालक राज कुंद्रा आणि गुरुनाथ मयप्पन यांनाही बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात दोषी ठरवले गेले होते. त्यांना क्रिकेटच्या कार्यक्रमांपासून आजीवन बंदी घालण्यात आली होती.
राजस्थान रॉयल्सचे मालकी हक्क जयपुर आयपीएल क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहेत. नाव बदलण्याबरोबरच राजस्थानचे होम ग्राउंड बदलण्याची ही विनंती राजस्थान रॉयल्स करणार आहे असे समजते आहे.