मागच्या महिन्यात आयसीसी टी२० विश्वचषक पार पडला. ऑस्ट्रेलियाने यावर्षी टी२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकले. तत्पूर्वी, पाकिस्तानला यावर्षी जेतेपद जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने उपांत्य सामन्यात त्यांचा पराभव केला. पाकिस्तानने यावर्षी विश्वचषकात पहिल्यांदाच भारताचा पराभव केला आणि इतिहास रचला. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीज राजा यांनी भारताविरुद्ध सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला एक महत्वाचा सल्ला दिला, ज्यामुळे पाकिस्तानने भारताला सहज पराभूत केले.
भारत आणि पाकिस्तानने टी२० विश्वचषकातील अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने केला होती. या सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल स्वस्तात बाद झाले. सलामीवीर अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तानने भारताला सहज पराभूत केले. आता पीसीबी अध्यक्ष रमीज राजांनी या सामन्याविषयी एक खुलासा केला आहे. राजांनी सांगितले की, त्यांनी कर्णधार बाबर आझमला रोहित शर्माला बाद करण्याचा सोपा मार्ग सांगितलेला. बीबीसीच्या एका पॉडकास्टवर बोलताना ते म्हणाले की, “विश्वचषकात जाण्यापूर्वी बाबर आजमशी माझी भेट झाली आणि मी त्याला विचारले की, भारतीय संघाविरुद्ध काय योजना असणार आहे ?”
रमीज राजांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना बाबर आझम म्हटला, “माझ्याकडे काही रणनीती आहेत आणि सोबतच काही एनालिस्ट देखील आहेत, जे कामी येतील.” यावर रमीज राजा म्हणाले, “मी समजू शकतो, पण भारताकडे सुद्धा अशा प्रकारचे उपाय असतील. ज्यामुळे ते तुमच्या विरोधात रणनीती तयार करू शकतात. मग मी त्याला रोहित शर्माला बाद करण्याविषयी योजना सांगितली आणि म्हटलो की, मी तुला रोहित शर्माला लवकर बाद करण्याची रणनीती सांगतो. शाहीन शाह आफ्रीदी १५० च्या वर गोलंदाजी करत आहे. त्याच्यासाठी शॉर्ट लेग लाव आणि एक धाव घेऊ देऊ नका. १५० च्या वेगाने येणारा इनस्विंग यॉर्कर टाकायला सांग आणि त्याला लवकर बाद करा.”
सामन्यादरम्यान, रमीज यांनी सांगितलेली रणनीती वापरलेली दिसली. शाहीनने रोहित शर्मा फलंदाजी करत असताना इनस्विंग यॉर्कर टाकला आणि रोहित एलबीडब्ल्यू बाद झाला. रोहित स्वस्तात बाद झाल्यामुळे भारतीय संघाचे मोठे नुकसाना झाले. पाकिस्तानने या सामन्यात तब्बल १० विकेट्स राखुन विजय मिळवला. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने भारताविरुद्ध मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला.