भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. मागील पाच वनडे सामन्यात त्याने तीन शतके झळकावली आहेत. सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात विराटला यश लाभले नाही. त्याचवेळी त्याला भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
विराटने मागील वर्षीच्या अखेरीस झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात शतक झळकावून वनडे शतकाचा तीन वर्षापासूनचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने दोन शतके साजरी केली. त्याचा हाच फॉर्म भारतीय संघासाठी पुढील महत्त्वाच्या मालिकांमध्ये कामी येऊ शकतो. अशात भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला रणजी ट्रॉफी कडे वळण्याचा सल्ला दिला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने आपल्या नावे केला. या सामन्यानंतर बोलताना शास्त्री यांनी विराटबाबत एक वक्तव्य केले. ते म्हणाले,
“विराट सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. आता भारत न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका जिंकूही शकतो. माझी अशी इच्छा आहे की, विराटने इंदोर येथे होणाऱ्या अखेरच्या वनडे सामन्यात सहभागी होऊ नये. त्याऐवजी त्याने रणजी ट्रॉफी सामन्यात भाग घ्यावा. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या आधी त्याचा त्याला फायदा होईल.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान फेब्रुवारी महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी नावाने ओळखली जाणारी ही मालिका जिंकण्याची भारतीय संघाकडे संधी असेल. दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विराटने मागील 11 वर्षांपासून रणजी ट्रॉफी खेळलेली नाही.
(Ravi Shastri Suggest Virat Kohli Skip 3rd ODI Against Newzealand And Play Ranji Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का! स्टार खेळाडू डोपिंग चाचणीत पाॅझिटिव्ह
द्विशतक होताच सचिनकडून साराचा शुबमनसोबत साखरपुडा फिक्स? ट्विट होतंय व्हायरल