भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका आणि त्यानंतर 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचीही निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू जवळपास 7 महिन्यांनंतर भारतासाठी क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. बराच काळानंतर हे दोन भारतीय दिग्गज एकत्र मैदानात उतरणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वनडे स्वरूपात रोहित आणि विराट यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. कांगारूंना सामोरे जाण्यासाठी हे दोघेच पुरेसे आहेत, असे आम्ही नाही म्हणत, तर आकडेच त्याची साक्ष देत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वनडे क्रिकेटमध्ये रोहित आणि विराट यांचा खेळ अतिशय शानदार राहिला आहे. रोहितने आतापर्यंत कांगारूंच्या मैदानावर 19 वनडे सामने खेळले आहेत. या काळात हिटमॅनने 58.23 च्या सरासरीने 990 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 4 शतके आणि 2 अर्धशतके झळकली आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 90.99 असा प्रभावी राहिला आहे.
कोहलीच्या आकडेवारीकडे पाहिल्यास, त्याने आतापर्यंत 18 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 47.17 च्या सरासरीने 802 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 4 अर्धशतके झळकली आहेत. विराटने 88.71 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.





