आशिया चषक 2022 च्या तिसऱ्या सुपर फोर सामन्यात भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान सामना रंगला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. केएल राहूल व विराट कोहली लागोपाठ बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र, कर्णधार रोहित शर्माने जबाबदारी उचलत शानदार अर्धशतक झळकावून भारताला सुस्थितीत आणले.
Leading from the front, Captain @ImRo45 brings up a fine FIFTY off 32 deliveries ????????
Live – https://t.co/JFtIjXSBXC #INDvSL #AsiaCup2022 pic.twitter.com/8ReqyqTS94
— BCCI (@BCCI) September 6, 2022
रोहितने संघाला अडचणीतून बाहेर काढत 32 चेंडूंमध्ये 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने आपले वर्षातील तिसरे अर्धशतक पूर्ण केले.
भारतीय संघाच्या सामन्यातील सुरुवात अत्यंत खराब झाली होती. केएल राहुल पंचांच्या एका खराब निर्णयाचा शिकार झाला व केवळ सहा धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेला विराट कोहली 4 चेंडू खेळून मधुशंका याच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडलेला असताना रोहितने कर्णधाराला साजेशी अशी खेळी केली. त्याने कोणताही दबाव न घेता खराब चेंडूंवर हल्ले चढवत षटकार चौकार वसूल केले.
सूर्यकुमार यादव याच्यासह त्याने शानदार 97 धावांची भागीदारी केली. रोहितने आपले अर्धशतक केवळ 32 चेंडूंमध्ये पूर्ण केले. त्यानंतर सलग दोन षटकार खेचत त्याने आपले आक्रमण आणखी वाढवले. मात्र, करूणारत्ने याच्या विरुद्ध मोठा फटका खेळण्याचा नादात आपला बळी गमावला. बाद होण्यापूर्वी त्याने 42 चेंडूवर 5 चौकार व 4 षटकार ठोकत 71 धावा केल्या. याच दरम्यान तो आशिया चषकात भारताकडून 1000 धावा बनवणारा पहिला फलंदाज बनला.






