---Advertisement---

…आणि रोहितचा रो’हिट’ झाला!

On: मंगळवार, नोव्हेंबर 2, 2021 8:30 AM
---Advertisement---

गेल्या 9 वर्षात रोहित शर्माने भारतीय संघासाठी अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. तो मागील काही वर्षांमध्ये भारताचा प्रमुख आणि अनुभवी सलामीवीर म्हणून सर्वांसमोर आला. वनडेत 3 द्विशतके करणारा तो भारताचाच नाही तर जगातील एकमेव फलंदाज आहे. आज त्याची गणना महान सलामीवीरांमध्ये केली जाऊ लागली आहे. पण या सर्वांच्या आधी 8 वर्षांपूर्वी एका खेळीने रोहितला क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. त्या खेळीने तो घराघरात फक्त पोहचला. त्या खेळीने रोहितला स्टार केले. ती खेळी म्हणजे त्याचे वनडेतील पहिले वहिले द्विशतक.

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) वनडे क्रिकेटमध्ये आजच्या दिवशी (2 नोव्हेंबर) 2013 मध्ये 209 धावांची द्विशतकी खेळी केली होती. अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवागनंतरचा तिसराच फलंदाज ठरला होता. या द्विशतकामुळे रोहितला क्रिकेटमध्ये एक नवी ओळख मिळाली.

त्याच्याआधी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) नाबाद 200 धावांची खेळी केली होती. तर त्यानंतर विरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) वर्षभराच्या कालावधीत सचिनच्या या विक्रमाला मागे टाकत 2011 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध वनडेत 219 धावांची खेळी केली होती.

https://twitter.com/ICC/status/1190478644881301504

सेहवागनंतर 2 नोव्हेंबर 2013 ला भारताच्याच रोहित शर्माने बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडीयमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात द्विशतकी खेळी केली. हा भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील 7 वा सामना होता. या मालिकेत या सामन्याआधी या दोन्ही संघांनी दोन सामने जिंकत 2-2 अशी बरोबरी केली होती.

त्यामुळे हा अखेरचा निर्णायक सामना होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यामुळे रोहित आणि शिखर धवन यांची जोडी सलामीला मैदानात उतरली. या दोघांनीही भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्यांनी 112 धावांची सलामी भागीदारी रचली. शिखर 60 धावांवर बाद झाला.

त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीही शून्य धावेवर धावबाद झाला. भारताला लागोपाठ दोन धक्के बसल्यानंतर रोहितने सुरेश रैनाला साथीला घेत डावाला आकार देण्यास सुरुवात केली. त्यांनी 72 धावांची भागीदारी केली. पण रैना 28 धावांवर आणि पाठोपाठ युवराज सिंग 12 धावांवर बाद झाले.

पण तोपर्यंत रोहितने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने शतक पुर्ण केल्यानंतर, ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजांचा चेंडू पार्कच्या बाहेर मारायला सुरुवात केली.

रोहितने या सामन्यात अर्धशतक 71 चेंडूत पूर्ण केले होते. तर त्यापूढील 50 धावा त्याने 43 चेंडूत पूर्ण करत शतक केले होते. त्यानंतर मात्र त्याने पुढील 109 धावा चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने केवळ 44 चेंडूत पूर्ण केल्या.

त्याचबरोबर त्याने आक्रमक खेळताना एमएस धोनीबरोबर 167 धावांची भागीदारीही रचली. या दोघांनी मिळून शेवटच्या 5 षटकात 100च्या आसपास धावा कुटल्या होत्या. पण भारताच्या डावातील शेवटून दुसऱ्या चेंडूवर रोहित 209 धावांवर बाद झाला. तर धोनी शेवटच्या चेंडूवर 62 धावांवर धावबाद झाला.

त्यामुळे भारताने 50 षटकात 6 बाद 383 धावंसख्या धावफलकावर लावत ऑस्ट्रेलियाला 384 धावांचे आव्हान दिले.

रोहितने त्याच्या द्विशतकी खेळीत 12 चौकार आणि 16 षटकारांची बरसात केली होती. त्यावेळी एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला. हा विक्रम 2019 च्या विश्वचषकात इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने मोडला. त्याने अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना 17 षटकार मारले.

https://twitter.com/mipaltan/status/1190504492313325570

या सामन्यात भारताने दिलेल्या 384 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 132 धावांवर बाद झाला. त्यामुळे विजय हा भारतासाठी केवळ औपचारिकता दिसत होता. परंतु, जेम्स फॉकनर, ग्लेन मॅक्सवेल आणि शेन वॉट्सन यांच्या शानदार फलंदाजीने भारतीय संघासमोर दबाव निर्माण केला.

फॉकनरने या सामन्यात 73 चेंडूत 116 धावा केल्या होत्या. तर, मॅक्सवेलने अवघ्या 22 चेंडूत 60 धावा केल्या आणि वॉट्सनने 22 चेंडूत 49 धावा केल्या. पण हे तिघेही बाद झाल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव 45.1 षटकात 326 धावांवर संपूष्टात आला आणि भारताने हा सामना 57 धावांनी जिंकत मालिकेत 3-2 ने विजय मिळवला.

https://twitter.com/SharadBodage/status/1190481938559037446

या सामन्यात सामनावीर तसेच मालिकावीराचा पुरस्कारही रोहितला देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---