रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. गेल्या 12 महिन्यांत रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला. मात्र यापैकी दोन (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा) सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्कारावा लागला. आता सध्या सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ पुन्हा एकदा विजयी रथावर स्वार असून टीम इंडियानं सलग सात सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. जर भारतीय संघाला अंतिम सामना जिंकण्यात यश आलं, तर रोहित कर्णधार म्हणून मोठी कामगिरी करेल.
टी20 विश्वचषक 2024 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघानं इंग्लंडचा पराभव करून फायनलचं तिकीट निश्चित केलं. या विजयासह रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये विजयांच्या बाबतीत सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. त्यानं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा विक्रम मोडला.
बाबर आझमनं आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 85 सामन्यात 48 विजय मिळवले आहेत. दुसरीकडे, रोहित शर्मानं केवळ 61 सामन्यांत 49 विजय नोंदवले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजेतेपदाचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, तर तो तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 सामने जिंकणारा पहिला कर्णधार ठरेल.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात असलेल्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये सलामीवीर रोहित शर्मानं सात डावात 248 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 41.33 आणि स्ट्राईक रेट 155.97 एवढा राहिला. त्यानं या स्पर्धेत तीन अर्धशतकंही झळकावली आहेत. रोहित शर्मा या विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून, अंतिम सामन्यातही त्याच्याकडून पुन्हा एकदा शानदार कामगिरीची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
अंतिम सामन्यात टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करायची की गोलंदाजी? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
IND vs RSA सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर ट्राॅफी कुणाची?
आता वर्ल्डकप आपलाच…!!! ‘पनौती’ म्हणून ओळख असलेल्या सेलिब्रेटीचा दक्षिण आफ्रिकेला सपोर्ट