इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीत दमदार शतक लगावणाऱ्या सलामीवीर रोहित शर्मा याने मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितले की, त्याने २०१९ मध्ये कसोटी संघात टिकून राहण्यासाठी मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे एकतर डावाची सुरुवात करणे किंवा कसोटी क्रिकेट विसरणे. कारण त्यावेळी कसोटी संघात जागा टिकवून ठेवण्यासाठी त्याच्याकडे शेवटची संधी होती.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या रोहित शर्माने ओव्हलवर १२७ धावांची शानदार खेळी केली आहे. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे आठवे शतक आहे, तर परदेशी भूमीवर रोहितचे हे पहिलेच शतक आहे. त्याच्या सलामीला येण्याच्या निर्णयाकडे मागे वळून पाहताना रोहित म्हणाला की, हा त्याचा सर्वोत्तम आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय होता. कारण कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा ठसा उमटवण्यासाठी त्याच्याकडे ती शेवटची संधी होती.
रोहित शर्माने आपल्या शतकी खेळीनंतर सांगितले, “मला माहित होते की, ही माझी कसोटी क्रिकेटमध्ये टिकून राहण्याची शेवटची संधी आहे. जेव्हा मला सलामीला फलंदाजी करण्याची विचारणा झाली, तेव्हा मला याची आधीच जाणीव होती. कारण व्यवस्थापनामध्ये कधीतरी माझ्याकडून डावाची सुरुवात करण्याची चर्चा होत होती. म्हणून, मी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवलं. मला ते आव्हान स्विकारायचे होते आणि मी कसे चांगले काम करू शकतो, ते मला पाहायचे होते. मला माहित होते की, ही माझी शेवटची संधी असेल. मी यशस्वी झालो नसतो तर काहीही होऊ शकले असते.”
याआधी, चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाच्या प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर सर्वबाद झाला होता. यासह इंग्लंडने भारतीय संघावर दुसऱ्या डावासाठी ९९ धावांची आघाडीही घेतली होती. त्यानंतर केएल राहुल आणि रोहित शर्माने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८३ धावांची सलामी दिली. रोहितने शानदार १२७ धावांची खेळी केली तर राहुलने ४६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या विकेट गेल्यानंतर विराट कोहली २२ तर रवींद्र जडेजा ९ धावांवर खेळत आहे. भारताकडे सध्या १७१ धावांची आघाडी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित, राहुलच्या ‘त्या’ फटक्याने वेधले सर्वांचे लक्ष, पाहून तुम्हालाही आठवेल मास्टर ब्लास्टर
इंग्लंडच्या गोलंदाजांचा पुजाराशी पंगा, चेंडू भिरकावत वटारले डोळे; पण प्रयत्न ठरले निरुपयोगी
शांत अन् संयमी नव्हे ओव्हलवरील खेळीत दिसला पुजाराचा ‘रुद्रावतार’, मोईनला शिकवला धडा!