आयपीएल २०२१ चा उत्तरार्ध सुरू व्हायच्या काही दिवस आधीच विराट कोहलीने घोषणा केली की, यावर्षी कर्णधार म्हणून आपण शेवटच्या वेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) ला लीड करतोय. यापुढे अखेरपर्यंत आपण आरसीबीसाठी फक्त एक खेळाडू म्हणून खेळू. त्यावेळी भारतीय संघ विजयाच्या रथावर स्वार होता. कर्णधार म्हणून विराट शेवटची आयपीएल खेळतोय म्हटल्यावर, आरसीबीच्या संघापासून, चाहत्यांपर्यंत सार्यांनी एकच लक्ष्य ठेवलं, ते म्हणजे आरसीबीने यावर्षी जिंकायलाच पाहिजे. टीम प्ले ऑफपर्यंत पोहोचली. पण, मागच्या वर्षीप्रमाणे यावेळीही एलिमिनेटरमध्ये गाडी घसरली आणि कर्णधार म्हणून आयपीएल ट्रॉफी उंचवायचं विराटच स्वप्न स्वप्नच राहिल.
आयपीएल २०२२ साठी आरसीबी आणखी तयारीने उतरली. एबी डिव्हिलियर्स रिटायर झाला होता. खेळाडूंचे रिटेन्शन आले तेव्हा विराटसह ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजला रिटेन केले गेले. टीमसाठी आठ वर्षे खेळणाऱ्या युजवेंद्र चहलकडे दुर्लक्ष केले. पुढे मेगा ऑक्शनमध्ये फाफ डू प्लेसिसवर मोठी बोली लावत त्याला सरळ कर्णधार बनवण्यात आले. जोडीला वानिंदु हसरंगा, जोस हेजलवूड, हर्षल पटेल हे खमके गोलंदाज होतेच. डोमेस्टिक क्रिकेटमधील बेस्ट टॅलेंटही टीममध्ये आले.
स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्याच सामन्याला २०७ धावा करूनही संघाला पराभव पाहावा लागला. यंदाही गेल्यावर्षी सारखीच गत होणार असं साऱ्यांना वाटलं. पण नंतर विजयरथ सुसाट सुटला. पुढच्या सहापैकी पाच सामने जिंकून, त्यांनी प्ले ऑफ्सच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र, हे पाऊल लगेचच अडखळले. सततच्या पराभवाने प्ले ऑफ यंदा हुकतेय का काय? असं वाटू लागलेलं.
त्यानंतर मात्र त्यांचं नशीब गेले मुंबई इंडियंसच्या हाती. आपल्या १४ सामन्यांपैकी ८ जिंकूनही आरसीबी चिंतेत होती. कारण, १३ सामन्यामध्ये ७ सामने जिंकलेली दिल्ली, मुंबई इंडियन्सविरुद्ध आपली शेवटची सामना एका रनाने जिंकली तरी, प्ले ऑफमध्ये जाणार होती. त्या शेवटच्या लीग मॅचमध्ये रोहितने विराटला मदत केली. दिल्लीला हरवत मुंबईने आपल्या हंगामाचा शेवट गोड केला आणि आरसीबीला सलग तिसऱ्या वर्षी प्ले ऑफचे तिकीट मिळाले.
लीग स्टेजपर्यंत आरसीबीसाठी बरेच हिरो मिळालेले. स्वतः कॅप्टन फाफ गरज पडेल तेव्हा उभा राहिला. वनिंदू हसरंगाने आपली किंमत वसूल करून देत, चहलची उणीव भासू दिली नाही. हेजलवूड आणि हर्षल सातत्याने विकेट्स घेत राहिले. मॅक्सवेलने सलग दुसऱ्या वर्षी आरसीबीसाठी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. मात्र संघाचा खरा मॅचविनर ठरला दिनेश कार्तिक. यावर्षी लिलावात पाच कोटी मिळवत आरसीबीत दाखल झालेल्या दिनेशने, वयाच्या ३७ व्या वर्षी तुफान बॅटिंग करत आपला फिनिशर अंदाज दाखवला. अनेक मॅचेस त्याने एकट्याच्या जीवावर काढल्या. मात्र, आजवर आरसीबीचा कर्ताधर्ता राहिलेला विराट दोन अर्धशतकांच्या पुढे काहीही योगदान देऊ शकला नाही. मागील वर्षी दमदार गोलंदाजी केलेला मोहम्मद सिराज यावर्षी पुन्हा एकदा डीरेल झाला.
मात्र, एलिमिनेटरमध्ये संघाला नवा हिरो मिळाला. नाव रजत पाटीदार… ओरिजनल स्कॉडमध्ये नसलेला रजत बदली खेळाडू टीममध्ये आलेला. मागील दोन वर्ष एलिमिनेटर हरलेली आरसीबी फायनलला जाण्यासाठी आतुर होती. त्यासाठी आधी एलीमिनेटरचा अडथळा त्यांना पार करायचा होता. ही जबाबदारी युवा रजतने आपल्या खांद्यावर घेतली. लखनऊ सुपरजायंट्सविरूद्ध एलिमिनेटरमध्ये वादळी शतक ठोकत त्याने संघाचा विजय साकार केला. मात्र, पुन्हा एकदा फायनलला जाण्याचे त्यांचे स्वप्न यावेळी क्वालिफायर २ मध्ये भंग पावले. जोस बटलरने अक्षरशः धावांचा पाऊस पाडत राजस्थानला १४ वर्षानंतर फायनलमध्ये नेले.
सुरुवातीला कुंबळे, द्रविड, कॅलिससारखे दिग्गज. त्यानंतर व्हेटोरी, विराट, गेल आणि एबी डिव्हिलियर्सचा एक मोठा काळ लोटला पण, आरसीबीला आयपीएलची ट्रॉफी उंचावता आली नाही. आता विराटने कॅप्टन्सी सोडल्यावर तरी, आरसीबी जिंकणार, या आशेवर बसलेल्या आरसीबीच्या कट्टर फॅन्सचा यावर्षीही भ्रमनिरास झाला. मोठ्या अपेक्षेने ‘इ साल कप नमदे’ म्हणत आपल्या संघाला, पंधरा वर्षापासून सपोर्ट करणाऱ्या आरसीबीच्या फॅन्सना मात्र आता ‘अगले साल कप नमदे’ म्हणायची वेळ आली आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराला दहा वर्षांपूर्वी समजलेलं कसा होणार आपला मृत्यू!
मुंबईने नारळ दिलेला हार्दिक पंड्या असा झाला आयपीएल विजेता कर्णधार