भारतासह जगभरातील अनेक देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीत अनेक खेळाडू सध्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच भारताचा फिरकीपटू आर अश्विन आणि श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रसल अरनॉल्डने इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ चॅटवर गप्पा मारल्या.
या गप्पांदरम्यान २००२ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौरव गांगुलीबरोबर झालेल्या वादाबद्दल अरनॉल्डने खुलासा केला आहे.
त्या सामन्यात फलंदाजी करत असताना अरनॉल्ड फटका मारल्यानंतर दोन-तीन पावले पुढे येत होता. त्यामुळे तो खेळपट्टीच्या धोकादायक क्षेत्रात जात असल्याचे कर्णधार गांगुली आणि यष्टीरक्षक द्रविडने त्याला आठवण करुन दिली होती. त्याचवेळी गांगुली आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली होती.
त्याबद्दल अरनॉल्ड आश्विनशी बोलताना म्हणाला, ‘मला वाटते, ही गोष्ट २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची आहे. आम्ही श्रीलंकेत खेळत होतो. श्रीलंका २०० धावांच्या आसपास होती, असे मला वाटते. मी लेट कट शॉट खेळला आणि खेळपट्टीवर २-३ पावले पुढे गेलो. आता जवळपास १८ वर्षे झाली आहेत, म्हणून मी प्रामाणिकपणे सांगेन. मी दोन-तीन पाऊल पुढे गेलो, प्रत्येकजण ते करतो. सौरव गांगुली त्यावेळी लगेचच आला आणि त्याने ओरडायला सुरुवात करत वाद घालायला सुरुवात केली.’
पुढे अरनॉल्ड म्हणाला, ‘काही झाले नाही. मग राहुल द्रविड मला म्हणाला, ‘रस, खेळपट्टीच्या धोकादायक क्षेत्रात जाऊ नको.’ हा केवळ हलकाफुलका वाद होता.’
याचबरोबर गांगुली खूप स्पर्धात्मक खेळायचा हे सांगताना अरनॉल्ड म्हणाला, ‘आम्ही सौरवबरोबर खेळायतो तेव्हा तो खूप स्पर्धात्मक असायचा. त्याला चांगले प्रतिउत्तर देता येत होते. त्याना चिडवणे देखील सोपे होते, तो नेहमीच प्रतिउत्तर द्यायचा.’
तसेच पुढे तो म्हणाला, ‘तो एक साधा वाद होता, या व्यतिरिक्त काहीही झाले नव्हते, हे सर्व खेळभावनेला धरुन होते. मला वाटते त्याला उगीच जास्त महत्त्व दिले गेले. मी केवळ ३ पावलेच पुढे गेलो होतो.’
हा अंतिम सामना कोलंबो येथे झाला होता. मात्र सामन्याच्या दिवशी आणि राखीव दिवशीही पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना रद्द करण्यात आला होता आणि श्रीलंका-भारत संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते.
त्या सामन्यात श्रीलंकेने ५० षटकात ७ बाद २२२ धावा केल्या होत्या. तसेच भारताने १ बाद ३८ धावा केल्या होत्या पण त्यानंतर पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही.
https://www.youtube.com/watch?v=8nabVOlNVOU
ट्रेंडिंग घडामोडी –
मुंबई इंडियन्समधून लसिथ मलिंगा बाहेर, रोहितलाही वाटले वाईट
म्हणून तब्बल १ वर्ष सचिन समोर जेवण करत नव्हता हा भारतीय क्रिकेटपटू