भारताच्या इंग्लड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून सुरवात होत आहे.
या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ जोरदार तयारीला लागले आहेत. भारतीय संघाने या इंग्लंड दौऱ्यात टी-20 मालिका 2-1 ने जिंकली होती, तर एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने भारतावर 2-1 ने विजय मिळवला होता.
असे असले तरी सर्व क्रिकेट जगताला भारत-इंग्लड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेविषयी उत्सुकता आहे.
या कसोटी मालिकेपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघात पहिल्या तीन कसोटी सामन्यासाठी भुवनेश्वर कुमार तर पहिल्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराह संघात नसल्याने चिंता व्यक्त केली आहे.
“भुवीला दुखापत झाल्याने भारतीय संघाला मोठ फटका बसला आहे. त्याच्या चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेमुळे या कसोटी मालिकेतून मला त्याच्याकडून खूप अपेक्षा होती.” असे मास्टर ब्लास्टर म्हणाला.
“भारताला वेगवान गोलंदाजांचे पर्याय भरपूर आहेत. पण भुवनेश्वरकडे फलंदाजी करण्याची चांगली क्षमता आहे. तळातील फलंदाजांना हाताशी घेउन तो चांगली फलंदाजी करतो. त्यामुळे त्याचे संघातील स्थान महत्त्वाचे आहे.” सचिन भुवनेश्वर विषयी बोलताना असे म्हणाला.
सचिनने पुढे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराह विषयी सुद्धा आपले मत मांडले.
“इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बुमराह न खेळल्यामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये बुमराह डेथ ओव्हर्समधील चॅम्पियन गोलंदाज आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरवातही चांगली केली आहे.” या शब्दात सचिनने बुमराहचे कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, स्टार गोलंदाजावर दोन वर्षाची बंदी
-म्हणून सचिन तेंडुलकरने इंग्लंडमध्ये सुरु केली क्रिकेट अकादमी






