भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानचा दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा पहिला डाव 156 धावांवर गुंडाळत 103 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. भारताच्या पहिल्या डावात अनुभवी विराट कोहली केवळ एक धाव करून बाद झाला. त्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट नऊ चेंडूंमध्ये केवळ एक धाव करून बाद झाला. मिचेल सॅंटनर याने त्याचा त्रिफळा उडवला. फुलटॉस मात्र काहीसा खाली येत असलेल्या चेंडूवर तो चकला आणि बाद झाला. अशा विचित्र पद्धतीने बाद झाल्यावर विराट काही क्षण खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्यानंतर माघारी परतला.
समालोचन करत असलेल्या संजय मांजरेकर यांनी यावेळी म्हटले की, “विराट नंतर जाऊन पाहिल तेव्हा कळेल की हा त्याने खेळलेला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फटका आहे. ही खरच दुःखद गोष्ट असून, विराट प्रत्येक वेळी एका ठोस आणि प्रामाणिक इराद्याने मैदानावर उतरत असतो.”
विराट याला या मालिकेतील पहिल्या सामन्यातही फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. तो बेंगलोर कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला. दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक झळकावलेले. मात्र, जम बसल्यानंतर तो खराब फटका खेळून तंबूत परतलेला. विराट सध्या आपल्या 81 व्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या शोधात असून, तो मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरत आहे.
पुणे कसोटीच्या पहिल्या डावात भारताचे फलंदाज पुरते अपयशी ठरले. मिचेल सॅंटनर याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना केवळ 53 धावांमध्ये सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यास, 2012 नंतर भारताला पहिल्यांदाच मायदेशात कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागेल. इंग्लंडने 2012 मध्ये भारताला मायदेशात कसोटी मालिकेत हरवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; केवळ एकाच धावेवर बाद कोहली! भारतात फिरकीपटूंविरूद्ध खूपच खराब रेकाॅर्ड
मोठी बातमी! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हटवली वॉर्नरवरील आजीवन कर्णधारपदाची बंदी
आयपीएल लिलावात कोणत्याही किंमतीत सुंदरला विकत घेऊ शकते सीएसके, वाचा यामागील कारणे