आयपीएलमध्ये बुधवारी (30 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) राजस्थान रॉयल्सला 37 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाने 174 धावा केल्या होत्या. कोलकाताच्या 175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाला केवळ 137 धावाच करता आल्या.
या सामन्यात केकेआर संघाचा वेगवान गोलंदाज शिवम मावी याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. या खेळाडूने 4 षटकांत 20 धावा देत 2 गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने आपल्या यशाचे रहस्य सांगितले आहे.
चेंडू बॅटवर येणार नाही याची होती कल्पना
“मी जेव्हा गोलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा चेंडू हवेत खूपच हालचाल करत होता. म्हणून मी विचार केला की एकाच लाईन आणि लेंथ वर चेंडू फेकेल. चेंडू बॅटवर येणार नाही याची कल्पना मला होती. सामना सुरू होण्यापूर्वी मला वाटले की खेळपट्टी सपाट आहे. मी यापूर्वीही या मोठ्या खेळाडूंविरुद्ध खेळलो होती,” असे आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना मावी म्हणाला.