जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा पंधराव्या हंगामाचे पडघम वाजू लागले आहेत. सर्व संघ आणि खेळाडूंची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २६ मार्चपासून मुंबई आणि पुणे येथे या स्पर्धेला सुरुवात होईल. आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात निवड झालेल्या सर्फराज खान (Sarfraz Khan) याने आगामी हंगामापूर्वी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला सर्फराज?
सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईच्या सर्फराज खानने नुकतीच आयपीएल व भविष्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“मला कोणी आत्मविश्वास दिला तर मी उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. अनेकांना वाटले होते मी लाल चेंडूचे क्रिकेट खेळू शकणार नाही. परंतु, मी यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे.”
सर्फराज सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022) मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने साखळी फेरीत तीन सामने खेळताना १३७.७५ च्या सरासरीने ५५१ धावा केल्या आहेत. त्याच्या या योगदानामुळे मुंबईचा संघ २०१८-२०१९ नंतर प्रथमच रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी पात्र ठरला आहे.
आयपीएल २०२१ मध्ये पंजाब किंग्ससाठी खेळलेल्या सर्फराजवर आगामी आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने विश्वास दाखवला आहे. या आयपीएल हंगामात तो संघासाठी विजयात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे. तो म्हणाला,
“मी मागील चार-पाच वर्षांपासून प्रथमश्रेणी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत होतो. आता त्यामध्ये चांगली कामगिरी होत आहे. हीच कामगिरी आयपीएलमध्येही करण्याचा माझा प्रयत्न राहील.”
सर्फराज २०१६ आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी खेळताना प्रसिद्धीझोतात आला होता. तेव्हा त्याने आक्रमक फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, नंतर त्याला कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधी दिसला हार्दिक पांड्याचा नवा अवतार, बनला ‘बॉम्ब एक्सपर्ट’ (mahasports.in)