मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 चे पहिले दोन सामने जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा सामना बुधवारी दुबईत कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 6 बाद 174 धावा केल्या. प्रत्त्युत्तरात राजस्थान रॉयल्स 9 बाद 137 धावा करू शकला. त्यामुळे कोलकाताने या वर्षीचा आयपीएलमधील पहिला विजय नोंदवला.
सामन्यानंतर जेव्हा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला प्रथम फलंदाजीची करण्याचा निर्णय घेणे योग्य होते का? असे विचारले असता, त्याने सांगितले की, ‘कोणताही निर्णय घेतला असता तरी फरक पडला नसता. आम्ही सुरुवातीला बर्याच विकेट्स गमावल्या.’
स्मिथ पुढे म्हणाला की, “आमचे काही फलंदाज कदाचित असा विचार करीत होते की, ते अजूनही शारजाहमध्ये खेळत आहेत.” हे लक्षात घेण्यासारखे आहे की, राजस्थान रॉयल्सने शेवटचे दोन सामने दुबईपेक्षा लहान मैदान असलेल्या शारजाह येथे खेळले. याशिवाय त्या खेळपट्टीवर फलंदाजी करणेसुद्धा सोपे आहे आणि त्यावर मोठे शॉट्स सहज खेळताना फलंदाज दिसत आहेत.
या दोन मैदानाची तुलना करताना तो म्हणाला, ”मैदानावरील समोरची सीमारेषा खूप मोठी आहे. आम्हाला त्या दिशेने जाणारे बरेच चेंडू दिसले नाहीत.” स्मिथने कबूल केले की, त्यांचा संघ मैदानावर ताळमेळ राखू शकला नाही. ‘आम्ही खेळपट्टी आणि मैदानाचा आकार यात ताळमेळ राखू शकलो नाही. आम्हाला काही झेल सोडणेदेखील महागात पडले,” असे स्टीव्ह स्मिथने सांगितले.
या सामन्यात स्मिथला त्याच्याच देशाचा संघ सहकारी गोलंदाज पॅट कमिन्सने बाद केले. त्याच्या पहिल्याच षटकात तो बाद झाला. यावर तो म्हणाला की, ” प्रत्यक्षात आमच्यात हा सामना नव्हता. मी कमिन्सला याविषयी बोललो. सहसा मी नेट्समध्ये अशा चेंडूवर मोठे शॉट्स मारतो. आज त्याने चांगला चेंडू फेकला.”