दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात मंगळवारपासून (११ जानेवारी) केपटाऊन येथे कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सुरू झाला. केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे.
पहिल्या सत्राखेर नाबाद राहिलेले विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या सत्राचीही चांगली सुरुवात केली. या दोघांनीही भारताचा धावफलक हलता राहिल याची काळजी घेतली. मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच पुजाराला ३८ व्या षटकात मार्को जेन्सेनने ४३ धावांवर बाद केले. त्याचे अर्धशतक केवळ ७ धावांनी हुकले. त्याच्यानंतर ४३ व्या षटकातच अजिंक्य रहाणेला ९ धावांवर कागिसो रबाडाने बाद केले.
भारताचा निम्मा संघ तंबूत.
दुसऱ्या सत्राच्या अखेरीस नाबाद असलेले कर्णधार विराट कोहली व यष्टीरक्षक रिषभ पंत यांनी तिसऱ्या सत्राची वेगवान सुरुवात केली. विराटने यादरम्यान आपले अर्धशतक पूर्ण केले. तर दुसऱ्या बाजूने रिषभ वेगवान फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, मार्को जेन्सनने वैयक्तिक २७ धावांवर रिषभला तंबूचा रस्ता दाखवला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा विराट ५६ तर रविचंद्रन अश्विन २ धावांवर खेळत होते. भारतीय संघाने पावणे दोनशे धावांचा पल्ला यादरम्यान पार केला आहे.
विराटचे हुकले शतक
पंत बाद झाल्यानंतर विराटने धावा वेगाने काढण्याचा प्रयत्न केला. समोरच्या बाजूने रविचंद्र अश्विन, शार्दुल ठाकुर व जसप्रीत बुमराह थोडाही प्रतिकार न करता बाद झाले. त्यामुळे दबाव आलेल्या विराटने दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज रबाडा याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो वैयक्तिक ७९ धावा काढून यष्टीरक्षक वेरानेकडे झेल देत माघारी परतला. त्यामुळे त्याच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ कायम राहिला.
दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात
भारतीय संघाला २२३ धावांवर सर्वबाद केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या सामन्याचा नायक कर्णधार डीन एल्गर केवळ ३ धावा काढून बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर एडन मार्करम व नाईट वॉचमन केशव महाराजने उर्वरित तीन षटके सांभाळून खेळत पहिल्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत १७ धावांपर्यंत मजल मारून दिली.
विराट-पुजाराने सावरला डाव
भारतीय संघाकडून केएल राहुल आणि मंयक अगरवालनने पहिल्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी सुरुवातीपासून चांगला खेळ केला होता. मात्र, खेळपट्टीवर स्थिरावले असे वाटत असतानाच लागोपाठो दोघांच्यागही विकेट गेल्या. केएल राहुलला १२ व्या षटकात डुआने ऑलिव्हियरने बाद केले, तर १३ व्या षटकात मयंक अगरवलला कागिसो रबाडाने माघारी धाडले. केएल राहुलने १२ आणि मयंक अगरवालने १५ धावा केल्या.
यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताच्या डावाची जबाबदारी घेत सावध खेळ केला. त्यांनी पहिल्या सत्राखेरपर्यंत विकेट जाणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळे भारताने पहिल्या सत्राखेर २८ षटकात २ बाद ७५ धावा केल्या. दुसऱ्या सत्रात पुजारा ४३ व रहाणे ९ धावा काढून बाद झाले.
भारताने जिंकली नाणेफेक
हा सामना जिंकत १-१ ने बरोबरीत असलेली मालिका जिंकण्याची संधी दोन्ही संघांकडे असणार आहे. तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकली आहे. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात २ प्रमुख बदल करण्यात आले आहेत. भारताचा कर्णधार विराट याचे या सामन्यातून पुनरागमन झाले आहे. तो मागील सामन्यात दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्याच्याजागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केल्या गेलेल्या हनुमा विहारीला पुन्हा बाकावर बसवण्यात आले आहे. तर दुखापतग्रस्त मोहम्मद सिराजच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाही.
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर(कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेने(यष्टीरक्षक), मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआने ऑलिव्हियर, लुंगी एन्गिडी