---Advertisement---

स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या 10 गोष्टी

On: शनिवार, ऑगस्ट 5, 2023 10:27 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान क्रिकेटपटू झाले आहेत. यामध्ये लाला अमरनाथ यांचेही नाव आदराने घेतले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संघाचे पहिले कर्णधार ठरलेल्या अमरनाथ यांची 05 ऑगस्ट रोजी पुण्यतिथी असते. यानिमित्ताने त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

अमरनाथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत 24 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी 24.38 च्या सरासरीने 878 धावा केल्या. यात त्यांच्या एका शतकाचा आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी 24 कसोटी सामने खेळताना 45 विकेट्सही घेतल्या.

अशा या भारताच्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटू बद्दल काही खास गोष्टी-

1. लाला अमरनाथ यांचा जन्म 11 सप्टेंबर 1911 मध्ये पंजाबमधील कपुरथाला येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नानिक अमरनाथ भारद्वाज असे आहे.

2. त्यांनी भारताबरोबरच गुजरात, हिंदू, महाराजा ऑफ पटियाला इलेव्हन, रेल्वे, दक्षिण पंजाब आणि उत्तर प्रदेश संघाकडूनही क्रिकेट खेळले आहे.

3. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांची हिट विकेट घेणारे अमरनाथ हे एकमेव गोलंदाज आहेत.

4. अमरनाथ यांना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदाजी देण्यात आली होती. त्यामुळे ते स्वतंत्र भारताच्या क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार ठरले. त्यांना नोव्हेंबर 1947 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचे कर्णधार करण्यात आले होते. या दौऱ्यात 5 पैकी चार कसोटी सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. तर 1 सामना अनिर्णित राहिला होता.

5. अमरनाथ हे भारताकडून पहिले कसोटी शतक झळकावणारे फलंदाज आहेत. त्यांनी इंग्लंड विरुद्ध 1933 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 118 धावांची शतकी खेळी केली होती. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी हे एकमेव शतक केले आहे.

6. लाला अमरनाथ यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 186 सामन्यात 41.37 च्या सरासरीने 10426 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या 31 शतकांचा आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 463 विकेट्ही घेतल्या आहेत.

7. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा 1952 मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका जिंकली होती. भारताने ही कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती.

8. अमरनाथ हे भारतीय क्रिकेटमधील विवादात्मक क्रिकेटपटूही राहिले आहेत. 1936 ला इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे कर्णधार विजयपुरमचे महाराज कुमार यांनी अमरनाथ यांना अर्ध्यादौऱ्यातून बेशिस्तीच्या कारणावरुन परत पाठवले होते.

9. अमरनाथ यांना भारत सरकारकडून 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

10. 2011 मध्ये बीसीसीआयने लाला अमरनाथ यांच्या नावाने रणजी ट्रॉफीमधील आणि मर्यादीत षटकांच्या देशांतर्गत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटूला पुरस्कार द्यायला सुरुवात केली.

11. अमरनाथ यांनी 19 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर निवड समीतीचे अध्यक्ष, भारतीय संघाचे व्यवस्थापक, समालोचक अशी अनेक भूमीका पार पाडल्या.

12. अमरनाथ यांच्या सुरिंदर, मोहिंदर आणि राजिंदर या तीनही मुलांनी क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली आहे. यातील सुरिंदर आणि मोहिंदर हे दोघे भारतीय संघाकडूनही खेळले.

13. अमरनाथ हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू क्रिकेटपटू होते. ते फलंदाजी, गोलंदाजी बरोबरच गरज पडली तर यष्टीरक्षणही करु शकत होते.

14. अमरनाथ यांचे 5 ऑगस्ट 2000 मध्ये निधन झाले.

महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या टी20तील घोडचूकीसाठी आयसीसीने भारत अन् वेस्ट इंडिजवर ठोठावला दंड, यजमानांचे मोठे नुकसान
The Hundred लीगमध्ये जॉर्डनचे रौद्ररूप! ‘एवढ्या’ चेंडूत ठोकल्या नाबाद 70 धावा, षटकारांची संख्या वाचाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment