पुणे । बीसीसीआयने ज्या पद्धतीने खेळाडूंना सुविधा पुरविल्या, चांगले मानधन मिळवून दिले, चांगले प्रशिक्षक तयार केले, त्यामुळेच भारतीय संघ क्रिकेट विश्वात आपले महत्वाचे स्थान निर्माण करू शकला. ज्याप्रमाणे बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना सुविधा, प्रशिक्षक आणि मानधन मिळवून दिले, त्याचप्रमाणे स्थानिक खेळाडूंना देखील अशी ‘सपोर्ट सिस्टीम’ मिळाली तर, नक्कीच भारतीय खेळाडू प्रत्येकच खेळात भारताचे नाव उंचावतील, असा आशावाद भारतीय संघाचे माजी कर्णधार व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांनी व्यक्त केला.
स्पोर्ट्सइंडीच्या वतीने बालशिक्षण सभागृह येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात गुरुबंस कौर, मुरलीकांत पेठकर, शांताराम जाधव यांना चंदू बोर्डे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कारागृह महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, स्पोर्ट्सइंडीच्या संचालिका सुप्रिया बडवे, बडवे इंजिनियारिंगचे श्रीकांत बडवे, स्पोर्ट्सइंडीचे समन्वयक श्रीपाद जवळेकर, जितेंद्र जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रोहन मोरे, शीतल महाजन, साक्षी महाले, जोसेफ डिसुझा, दत्तू भोकनळ, रणजीत नलावडे, आकांक्षा हागवणे, वेदांगी कुलकर्णी व संपदा बुचडे यांना स्पोर्ट्सइंडी क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना कारागृह महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव म्हणाले की, हार-जीत हा खेळातला अविभाज्य घटक आहे. यामुळे खेळाडू पराभव देखील पचवायला शिकतो. खेळाच्या माध्यमातून जर समाज पराभव पचवायला शिकला तर नक्कीच कायदा-सुव्यवस्थेवर कधीच ताण पडणार नाही.
स्पोर्ट्सइंडीच्या संचालिका सुप्रिया बडवे यावेळी म्हणाल्या की, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहणार आहोत. नव्या दमाच्या खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळावे, या उद्देशानेच स्पोर्ट्सइंडीची स्थापना करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पोर्ट्सइंडीच्या संचालिका सुप्रिया बडवे यांनी, बडवे इंजिनियारिंगचे श्रीकांत बडवे यांनी आभार तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध दडके यांनी केले.