भारत आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकेती पहिला सामना खेळला गेला. हा सामना शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिला. सामन्यादरम्यान पाचही दिवस स्टेडियमवरील वातावरणात खूपच धुके पाहायला मिळाले. स्टेडियमवरील चित्र देखील अस्पष्ट दिसत होते. तर दुसरीकडे सामन्याचे समालोचन करणारे भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी स्टेडियमवरील मोठी कमतरता समोर आणली. त्यानंतर त्यावर तत्काळ निर्णय देखील घेतला गेला. गावसकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे स्टेडियममध्ये एका दिवसात नवीन लिफ्टचे भूमिपूजन करण्यात आले.
न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळला गेला. ग्रीन पार्क स्टेडियमच्या मीडिया गॅलरीमधील लिफ्टचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी देखील ही लिफ्ट न बसवल्यामुळे गावसकरांनी नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी (२७ नोव्हेंबर) यूपीसीए (उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन) आणि खेळ संचालकांसमोर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनासोबत मिळून स्टेडियमच्या मीडिया गॅलरीमध्ये लिफ्ट बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रविवारी दुपारी गावसकर आणि जिल्हाधिकारी डॉ. राजशेखर यांनी या लिफ्टचे भूमिपूजन केले. भूमिपूजनानंतर गावसकरांनी प्रश्न उपस्थित केला की, लिफ्ट लावण्यासाठी एवढा उशीर का झाला? मी २०१६ मध्ये ग्रीन पार्कमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान लिफ्ट लावण्यासाठी विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही तुम्ही लिफ्ट लावली नाही. गावसकरांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ते म्हणाले की, लोक गावसकरांच्याच हाताने भूमिपूजन करू इच्छित होते. त्याच कारणास्तर उशीर झाला. विशेष म्हणजे कानपूर शहर हे गावसकर यांच्या पत्नीचे माहेर आहे.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध ग्रीन पार्क स्टेडियाममध्ये खेळल्या गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ विजयापासून अवघ्या एका विकेटच्या अंतरावर होता. मात्र, कमी सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. न्यूझीलंडने शेवटच्या दिवशी ९ बाद १६५ धावांचा टप्पा गाठला. तत्पूर्वी, भारताने न्यूझीलंडसमोर दुसऱ्या डावात विजयासाठी २८३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे न्यूझीलंडला गाठता आले नाही. तसेच भारतीय गोलंदाजही न्यूझीलंडला सर्वबाद देखील करू शकले नाहीत. परिणामी सामना अनिर्णित ठरला.