तब्बल 15 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून दारूण पराभव केला. विजेतेपदाचे दावेदार असताना अशारीतीने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघावर टीका होतेय. त्याचवेळी भारतीय संघाचे माजी कर्णधार व प्रसिद्ध समालोचक सुनील गावसकर यांनी भारतीय खेळाडूंच्या भविष्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
साखळी फेरीत आपल्या गटात अव्वलस्थानी राहिलेल्या भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. कर्णधार रोहित शर्मा व केएल राहुल हे पुन्हा एकदा अपयशी ठरले. अनुभवी विराट कोहली व अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी शानदार अर्धशतके करत भारतीय संघाचा सन्मान वाचवत संघाला 168 पर्यंत मजल मारून दिली. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. कर्णधार जोस बटलर व ऍलेक्स हेल्स या सलामीवीरांनी केवळ 16 षटकात भारतीय संघाने दिलेले आव्हान पार केले. यासह इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारतीय संघाच्या या पराभवानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसिद्ध समालोचक सुनील गावसकर म्हणाले,
“भारतीय संघ आज आपले सर्वोत्तम क्रिकेट खेळला नाही. मला असे वाटते की, या पराभवानंतर काही खेळाडू निवृत्तीचा विचारही करतील. सध्या वयाच्या तिशीत असलेले खेळाडू संघातील आपल्या स्थानाचा नक्कीच विचार करतील.”
गावसकर यांनी भारतीय संघात बदल करण्याबाबतही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले,
“भारतीय संघाच्या भविष्याचा विचार केल्यास हार्दिक पंड्या नेतृत्व करू शकते. त्याने आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे. हे निर्णय लवकर होतात की वेळ लागेल हे पाहणे रंजक आहे.”
भारतीय संघाच्या पराभवानंतर अनेकांनी कर्णधार रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून हटवावे अशी मागणी केली आहे. तर, काहींनी भुवनेश्वर कुमार व रविचंद्रन अश्विन या अनुभवी खेळाडूंवरही निशाणा साधला. (Sunil Gavaskar Said Some Retirements Might aAlso Be Coming After This Loss)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप जिंकला नसला, तरी ‘किंग’ कोहलीमुळे कोट्यवधी भारतीय विसरणार नाहीत हा विश्वचषक; कसं ते वाचा
मोठी बातमी! भारतात क्रिकेटचा पाया रचणारा दिग्गज हरपला, चाहते दु:खात