टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये गतविजेत्या भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा (USA) 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात एका वेळी भारताची स्थिती 77 धावांवर 6 विकेट्स अशी बिकट झाली होती. पण कर्णधार सूर्यकुमार यादवने शानदार खेळी करत 49 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी केली आणि टीम इंडियाला 161 धावांपर्यंत पोहोचवले.
आता 12 फेब्रुवारीला दिल्लीत नामीबियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात सूर्याकडे विराट कोहलीला मागे टाकण्याची सुवर्णसंधी आहे. सूर्यकुमार यादव सध्या टी20 फॉरमॅटमधील सर्वात खतरनाक फलंदाज मानला जातो. नामीबियाविरुद्धच्या सामन्यात जर सूर्याने अर्धशतक (50 धावा) झळकावले, तर तो मायदेशात (भारतात) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ’50 प्लस’ धावांचे डाव खेळणारा नंबर-1 भारतीय फलंदाज ठरेल. सध्या सूर्या आणि विराट कोहली दोघेही 14 अशा डावांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत.
भारतात सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी:
विराट कोहली: 14
सूर्यकुमार यादव: 14
केएल राहुल: 12
रोहित शर्मा: 10
इशान किशन: 8
भारतीय मैदानांवर सूर्यकुमारची आकडेवारी थक्क करणारी आहे. त्याने आतापर्यंत 44 सामन्यांच्या 43 पार्यांमध्ये 39 च्या सरासरीने 1404 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 अर्धशतके आणि 1 शतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतात खेळताना त्याचा स्ट्राईक रेट 170.18 इतका जबरदस्त आहे. त्याने आतापर्यंत घरच्या मैदानावर 86 षटकार आणि 126 चौकार ठोकले आहेत.






