मंगळवार, 13 जानेवारी रोजी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या विषयावर बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांची व्हर्च्युअल बैठक झाली. बांगलादेशने पुन्हा एकदा वर्ल्ड कपसाठी भारत दौरा न करण्याबाबत भाष्य केले. आयसीसीसोबत झालेल्या या व्हर्च्युअल बैठकीत बीसीबीचे अध्यक्ष मोहम्मद अमिनुल इस्लाम यांच्यासह अनेक उच्च अधिकारी सहभागी झाले होते. बांगलादेशने पुन्हा एकदा सुरक्षेच्या कारणांचा हवाला देऊन भारत दौरा न करण्याबाबत सांगितले.
बीसीबीकडून सांगण्यात आले की, बांगलादेशी खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता त्यांचे सामने भारताबाहेर आयोजित केले जावेत. आयसीसीने याला उत्तर देताना स्पष्ट केले की, स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे आणि बांगलादेशला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज आहे.
हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे , या बैठकीत बीसीबीचे अध्यक्ष मोहम्मद अमिनुल इस्लाम, उपाध्यक्ष फारूक अहमद आणि मोहम्मद शकवत हुसैन, क्रिकेट ऑपरेशन्स कमिटीचे चीफ एक्झिक्युटिव्ह नजमुल आबेदीन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी उपस्थित होते. दुसरीकडे, बीसीबीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपचे वेन्यू बदलण्याच्या मागणीवरील आपल्या भूमिकेत बदल केलेला नाही. असेही सांगितले जात आहे की, भारत आणि बीसीसीआयसोबत (BCCI) बिघडत चाललेल्या संबंधांमुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
बीसीसीआयशी पंगा घेतल्यामुळे बांगलादेशी खेळाडूंचेही नुकसान होऊ शकते. क्रिकेटचे साहित्य बनवणारी भारतीय कंपनी ‘एसजी’ (SG) अनेक बांगलादेशी खेळाडूंना स्पॉन्सर करते. यामध्ये लिटन दास आणि मोमिनुल हक यांसारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, भारत आणि बांगलादेशमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एसजी कंपनी बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचे करार संपवू शकते.






