जोहान्सबर्ग। भारताने पहिल्या टी २० सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ धावांनी विजय मिळवला आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ षटकात २४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ९ बाद १७५ धावांवर रोखण्यात यश मिळवले. दक्षिण आफ्रिकेकडून रिझा हेन्ड्रिक्सने एकाकी लढत देताना शानदार अर्धशतकी खेळी केली.
भारताने दिलेल्या २०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फलंदाज जेजे स्मटस(१४) लवकर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ लगेचच प्रभारी कर्णधार जेपी ड्युमिनीला(३) भुवनेश्वर कुमारने सुरेश रैना करवी झेलबाद केले.
हे दोघे बाद झाल्यावर डेव्हिड मिलरलाही(९) हेन्ड्रिक्सला साथ देण्यात अपयश आले. मात्र त्यानंतर फरहान बेहार्डीनने हेन्ड्रिक्सला चांगली साथ देताना त्याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची भक्कम भागीदारी केली. ही जोडी तोडण्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलला यश आले.
बेहार्डीनने २७ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. त्यानंतर काही वेळाने हेन्ड्रिक्सही बाद झाला. त्याने आज ८ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ५० चेंडूत ७० धावा केल्या. त्याला भुवनेश्वर कुमारने यष्टीरक्षक धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले.
त्यानंतर १८ व्या षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी विकेट्स गमावल्या. या षटकात भुवनेश्वरला हॅट्रिक करण्याची संधी होती. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट तर गेली परंतु डेन पीटरसन(१) धावबाद झाल्याने भुवनेश्वरची हॅट्रीकची संधी हुकली. पण भारतीय संघाला मात्र हॅट्रिक मिळाली.
दक्षिण आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांपैकी अँडिल फेहलूकवयो(१३), हेन्रिक क्लासेन(१६), ख्रिस मॉरीस(०),जुनिअर डाला(२*), ताब्राईझ शम्सी(०*) यांनी धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार(५/२४),जयदेव उनाडकट(१/३३), हार्दिक पंड्या(१/४५) आणि युजवेंद्र चहल(१/३९) यांनी विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, भारताने शिखर धवनच्या आक्रमक अर्धशतकच्या जोरावर ५ बाद २०३ धावांचा डोंगर उभा केला होता. भारतीय संघाकडून आज स्फोटक खेळ करण्यात आला. शिखरने ३९ चेंडूत ७२ धावांची आक्रमक खेळी केली. यात त्याच्या १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. शिखरचे हे आंतराष्ट्रीय टी २० तील चौथे अर्धशतक आहे.
त्याला आज सुरेश रैना(१५) आणि कर्णधार विराट कोहलीने(२६) आक्रमक खेळत चांगली साथ दिली पण हे दोघेही खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर बाद झाले. त्याआधी सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा ९ चेंडूत २१ धावा करून बाद झाला.
भारताकडून मनीष पांडेनेही नाबाद खेळत चांगली शिखरची चांगली साथ दिली. त्याने २७ चेंडूत नाबाद २९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. अखेरच्या काही षटकात एम एस धोनीनेही आक्रमक खेळी केली पण तोही ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्याने(१३*) अखेरच्या षटकात स्फोटक खेळ करून भारताला २०३ धावांचा टप्पा पार करून दिला.
दक्षिण आफ्रिकेकडून जुनिअर डाला(२/४७), ख्रिस मॉरिस (१/३९), ताब्राईझ शम्सी (१/३७) आणि अँडिल फेहलूकवयो(१/१६) यांनी विकेट्स घेतल्या.