---Advertisement---

पहिल्या कसोटीत टीम इंडियाच निघाली ‘शेर’, बांगलादेशला 188 धावांनी चारली धूळ

On: रविवार, डिसेंबर 18, 2022 10:03 AM
Team India
---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला गेला. या सामन्याचा रविवारी (18 डिसेंबर) शेवटचा दिवस होता, ज्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत यजमान संघाला पराभवाचा धक्का दिला. हा सामना भारताने 188 धावांनी जिंकत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. यावेळी बांगलादेशच्या दुसऱ्या डावात भारताकडून अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी गोलंदाजीत उल्लेखनीय प्रदर्शन केले. या विजयाने भारताच्या आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा आशा वाढल्या आहेत.

या सामन्यात भारत केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळला. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या सामन्यास मुकला. 14 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. भारताने पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच्या 90 धावा, श्रेयस अय्यरच्या 86 आणि आर अश्विनच्या 58 धावा यांच्या खेळीच्या जोरावर सर्व विकेट्स गमावत 404 धावसंख्या उभारली.

त्याचबरोबर कुलदीप यादव याने पहिल्या डावात उत्तम फलंदाजी करताना गोलंदाजीतही कमाल केली. त्याने बॅटने 40 धावा काढल्या तर बांगलादेशच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याला मोहम्मद सिराज याने उत्तम साथ दिली. सिराजने या डावात 3 विकेट्स काढल्या. त्यामुळे बांगलादेशचा पहिला डाव 150 धावसंख्येवरच संपुष्टात आला होता.

तसेच भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी केली, ज्यामध्ये शुबमन गिल याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 110 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर पुजारानेही बांगलादेशच्या अडचणी वाढवल्या. त्याने नाबाद 102 धावांची खेळी करत भारताची आघाडी 500 धावसंख्येच्या पुढे केली. भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहली 19 धावा करत नाबाद राहिला. यामुळे बांगलादेशला विजयासाठी 513 धावसंख्येचे लक्ष्य मिळाले.

यजमानांनी दुसऱ्या डावात चांगली सुरूवात करत भारताच्या चिंतेत वाढ केली. नजमुल शांतो आणि झाकिर हसन या सलामीवीरांनी 124 धावांची ऐतिहासिक खेळी केली. शांतो 67 धावा करत बाद झाला, तर हसनने शतकी खेळी केली. त्याने 100 धावा केल्याने बांगलादेशने 200चा आकडा पार केला. कर्णधार शाकिब अल हसन यानेही बांगलादेशच्या डावात 84 धावा जोडल्या. यामुळे भारत हरणार की काय अशी स्थिती निर्माण झाली, मात्र पुन्हा एकदा कुलदीपने चांगली कामगिरी केली. त्याने 3 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे अक्षर पटेल यानेही 4 विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली.

या सामन्यात कुलदीपने 40 धावा करताना एकूण 8 विकेट्स घेतल्या. यामुळे तो सामनावीरचा मानकरी ठरला. त्याचबरोबर त्याने पहिल्या डावात 16 षटकात 40 धावा देत 5 विकेट्स घेतल्या, ही त्याची कसोटीतील सर्वोत्कृष्ठ कामगिरी ठरली.

बांगलादेश विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरला ढाका येथे खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WC 2022: आक्रमक क्रोएशिया मोरोक्कोवर भारी, तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात थरारक विजय
एफसी गोवाचा वर्चस्वपूर्ण विजय, नॉर्थ ईस्ट युनायटेडचा सलग दहावा पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---