भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांच्यातील संबंध सध्या ताणलेले आहेत. बीसीसीआयने आयपीएल 2026 मधून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला (Mustfijur Rehman) बाहेर काढले, ज्याचे प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतात सामने खेळण्यास नकार दिला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांचे संघ जानेवारी महिन्यातच एकमेकांसमोर येणार आहेत.
साधारणपणे भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात मोठा थरार पाहायला मिळतो, पण यावेळी भारत-बांगलादेश (IND vs BAN) सामनाही तितकाच रोमांचक ठरणार आहे. अंडर-19 वनडे वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 15 जानेवारीपासून होत आहे.
भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध (USA) होईल.
भारत आणि बांगलादेश एकाच ग्रुपमध्ये असल्याने 17 जानेवारीला या दोन्ही देशांत मोठी लढत होईल. हा सामना झिम्बाब्वेमधील बुलवायो शहरात खेळला जाईल.
या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे साखळी फेरीत (League Stage) हे दोन संघ आमनेसामने येणार नाहीत. मात्र, दुसऱ्या फेरीमध्ये (Super 8/Knockout) भारत आणि पाकिस्तानची लढत होण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार, टीम इंडियाचे सर्व सामने दुपारी 1 वाजता सुरू होतील.
भारतीय अंडर-19 संघ (स्क्वॉड)
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंह (यष्टीरक्षक), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंह, उधव मोहन.






