---Advertisement---

२०१९ विश्वचषकानंतरचा टीम इंडियाचा विजयी रथ न्यूझीलंडने रोखला

On: शनिवार, फेब्रुवारी 8, 2020 3:57 PM
---Advertisement---

ऑकलँड। आज(8 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात इडन पार्कवर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 22 धावांनी विजय मिळवला आणि वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 273 धावा केल्या आणि भारताला 274 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 48.3 षटकात सर्वबाद 251 धावाच करता आल्या.

या सामन्यात भारताच्या फलंदाजांची वरची फळी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांपुढे गडगडली. भारताने 31.1 षटकात 153 धावांवर 7 विकेट्स गमावल्या होत्या. यामध्ये केवळ श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी करत एकाकी झूंज दिली, मात्र तोही 52 धावांवर झेलबाद झाला.

पण वरच्या फळीला धावा करण्यात आलेल्या अपयशानंतर रविंद्र जडेजा आणि नवदीप सैनीने भारताचा डाव भक्कमपणे सांभाळताना 8 व्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचली. मात्र सैनी 45 धावा करुन बाद झाला. यानंतर चहल 10 धावांवर धावबाद झाला आणि अखेर जडेजा 49 व्या षटकात 55 धावांवर जेम्स निशमच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्याने भारताचा डाव संपुष्टात आला.

न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना हमिश बेनेट, टीम साऊथी, काईल जेमिसन आणि कॉलिन डी ग्रँडहोमने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तसेच जेम्स निशमने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने 79 धावांची, तर रॉस टेलरने नाबाद 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच हेन्री निकोल्सने 41 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडला 273 धावा करता आल्या. भारताकडून गोलंदाजी करताना युजवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने 2 आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

या पराभवामुळे भारताने ही वनडे मालिका गमावली आहे. विशेष म्हणजे भारताने 2019 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका गमावली आहे. ही 2019 विश्वचषकानंतरची भारताची 13 वी द्विपक्षीय मालिका आहे. याआधी झालेल्या 12 द्विपक्षीय मालिकांपैकी भारताने 11 मालिका जिंकल्या आहेत. तर 1 मालिका बरोबरीत सुटली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---