आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून (१९ सप्टेंबर) यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलचे सर्व संघ आमने-सामने आलेले पाहायला मिळणार आहेत. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात हंगामातील २९ सामने खेळले गेले आहेत, तर आता दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ३१ सामने खेळले जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात शिखर धवनने सर्वाधिक ३८० धावा केल्या आहेत आणि तसेच हर्षल पटेलने सर्वाधिक १७ विकेट्स घेतल्या आहेत. आता स्पर्धेतील उर्वरित सामने पुन्हा आयोजित केले गेले आहेत. आता हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे की कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करतो किंवा कोणता खेळाडू सर्वाधिक विकेट्स मिळवतो? आपण या लेखात अशा ३ खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, जे आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकू शकतात.
१. केएल राहुल
आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलसाठी आयपीएलचा पहिला टप्पा चांगला राहिला आहे. त्याने पहिल्या टप्प्यातील खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये १३६.२१ च्या स्ट्राइक रेटने आणि ६६.२० च्या सरासरीने ३३१ धावा केल्या आहेत. तो सध्या आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या मागच्या हंगामामध्ये पंजाब किंग्ज संघ प्लेऑफमध्ये जागा बनवू शकला नव्हता. पण केएल राहुलला स्पर्धा संपल्यावर ऑरेंज कॅप मिळाली होती. त्याने आयपीएल २०२० च्या हंगामात एकूण १४ सामन्यांमध्ये १२९.३४ च्या स्ट्राइक रेटने आणि ५५.८४ च्या सरासरीने ६७० धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या एका शतकाचा आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता.
२. फाफ डु प्लेसिस
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज फाफ डु प्लेसिस आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने पहिल्या टप्प्यात १४५.४५ चा स्ट्राइक रेट आणि ६४ ची सरासरी राखत ३२० धावा फटकावल्या आहेत.
फाफने आयपीएलच्या मागच्या हंगामातही चांगली कामगिरी केली होती. त्याने यूएईत आयोजित आयपीएल २०२० मध्ये खेळलेल्या १३ सामन्यात ४४९ धावा केल्या होत्या. या धावा त्याने १४०.७५ चा स्ट्राइक रेट आणि ४०.८१ ची सरासरीने केल्या होत्या. तो सध्या दुखापतग्रस्त आहे. असे असले तरी, जर तो खेळण्यासाठी फिट झाला तर तो यावर्षीही आयपीएलमध्ये मोठी धावसंख्या गाठू शकतो.
३. सूर्यकुमार यादव
मुंबई इंडियन्सचा वरच्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादवचाही या यादीत समावेश आहे. त्याने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात २४.७१ ची सरासरी आणि १४४.१६ च्या स्ट्राइक रेटसह १७३ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने केलेल्या एका अर्धशतकाचाही समावेश आहे.
यावर्षी पार पडलेल्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यात सूर्यकुमारने चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले होते आणि त्याच्या या प्रदर्शनाच्या जोरावरच त्याने टी २० विश्वचषकामध्ये खेळण्याची संधी मिळवली आहे. अशात त्याने जर त्याचा चांगला फार्म कायम राखला तर तो या हंगामामध्ये मोठी धावसंख्या तर करेलच, पण मुंबई इंडियन्स संघासाठी ट्राॅफी जिंकवण्यातही महत्वाची भूमिका पार पाडू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल: २००८-२०२०, ‘या’ फलंदाजांनी जिंकलीय ऑरेंज कॅप, ‘हा’ धुरंधर विक्रमतोड ४ वेळा ठरलाय मानकरी
आयपीएल: २००८-२०२०, ‘या’ मातब्बर गोलंदाजांनी जिंकलीय पर्पल कॅप; एक भारतीय सलग २ वर्षे ठरलाय मानकरी
आयपीएलच्या उत्तरार्धात लागणार विक्रमांची रास, पाच भारतीयांसह पोलार्ड-मॉरिस ठोकणार ‘अनोखे’ शतक?