महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये सोमवार (16 जून) आयोजक, सर्व सहभागी संघ आणि चाहत्यांसाठी निराशाजनक राहिला. एकाच दिवशी होणारे सर्व तीन सामने पावसामुळे रद्द करावे लागले. या कारणाने गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली. स्पर्धा ऐन रंगात आली असताना, अशाप्रकारे सामने रद्द झाल्याने सर्व खेळाडू निराश दिसले.
एमपीएल 2025 मध्ये सोमवारी सर्व संघ मैदानात उतरणार होते. त्यामुळे चाहत्यांना तीन सामन्यांचे मेजवानी मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने रत्नागिरी जेट्स विरुद्ध रायगड रॉयल्स हा सामना सुरुवातीला स्थगित करण्यात येईल असे सांगितले गेले. दुपारी पावसाने काहीशी उघडीप दिली. मात्र, खराब मैदानामुळे खेळ सुरू होऊ शकला नव्हता. सायंकाळच्या सत्रात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स हा सामना देखील सुरू होऊ शकला नाही. त्यानंतर आयोजकांनी दोन्ही सामने रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केली.
दिवसातील तिसरा सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध सातारा वॉरियर्स असा रंगणार होता. हा सामना सुरू होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, पुन्हा एकदा वरूण राजाने हजेरी लावल्याने, खेळाडू व चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले. त्यामुळे एकाच दिवशी सर्व तीन सामने रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर आली. स्पर्धेत आत्तापर्यंत पाच सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. याचा सर्वात मोठा तोटा पुणेरी बाप्पा संघाला बसला असून, त्यांचे तब्बल तीन सामने पूर्ण होऊ शकते नाहीत. त्या पाठोपाठ कोल्हापूर टस्कर्स संघाचे देखील दोन सामने पावसामुळे वाया गेले. स्पर्धेचा अंतिम टप्पा जवळ आला असल्याने, प्रत्येक सामना महत्वपूर्ण मानला जातोय.
सध्या गुणतालिकेत ईगल नाशिक टायटन्स सर्वाधिक पाच विजयासह पहिल्या स्थानी आहे. तसेच त्यांच्या दोन सामने पावसामुळे वाया गेलेले. या कारणाने त्यांच्या खात्यात एकूण 12 गुण असून, ते प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करणारा पहिला संघ बनले आहेत.






