आयपीएलच्या प्रत्येक हंगामात आपल्याला रोमांचक सामने पाहायला मिळतात. आतापर्यंतच्या झालेल्या १२ हंगामांमध्ये या स्पर्धेने जगभरातील चाहत्यांचे मनोरंजन केले असून आयपीएलची लोकप्रियता वाढवली आहे. आयपीएलची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती जगभरातील दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळतात.
या स्पर्धेत फलंदाजांनी आपले वर्चस्व गाजवले आहे. आयपीएलमध्ये बर्याच वेळा असे घडले आहे की, संघाने एकही बळी न गमावता १० गडी राखून विजय मिळविला आणि विरोधी संघाला एकतर्फी पराभूत केले.
या लेखात, आम्ही तुम्हाला अशा ३ संघांविषयी सांगू ज्यांनी एकही बळी न गमावता आयपीएलमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे. चला तर मग या यादीतील टॉप ३ संघ कोणते आहेत ते जाणून घेऊया.
एकही बळी न गमावता सर्वात मोठे लक्ष्य यशस्वीरित्या गाठणारे आयपीएलच्या इतिहासातील टॉप ३ संघ
३. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – २०१२ (सचिन तेंडुलकर – ड्वेन स्मिथ)
आयपीएलच्या पाचव्या सत्रात (२०१२ मध्ये) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूर येथे सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत ६ गडी गमावून १६२ धावा केल्या. त्यावेळी राजस्थानकडून शेन वॉटसनने सर्वाधिक ४५ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सने एकही गडी न गमावता १८ षटकांत हे लक्ष्य गाठले. सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथ यांनी मुंबई इंडियन्ससाठी नाबाद सलामी भागीदारी केली. सचिनने नाबाद ५१ चेंडूत ५८ आणि ड्वेन स्मिथने ५८ चेंडूत ८७ धावांची नाबाद खेळी केली आणि यशस्वीरीत्या हे लक्ष्य एकही गडी न गमावता गाठलं.
२. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – २०२० (शेन वॉटसन – फाफ डु प्लेसी)
आयपीएलच्या १३ व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा एकतर्फी पराभव केला. सीएसकेचा संघ या सामन्याआधी सलग ३ सामने पराभूत झाला होता, परंतु त्यांनी या सामन्यात पंजाबला १० गडी राखून पराभूत केले आणि आपल्या पराभवाची मालिका थांबवली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकांत १७८/४ धावा केल्या, त्या प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने १८ व्या षटकात एकही बळी न गमावता १८१ धावा करत सामन्यात विजय मिळवला. चेन्नईकडून फाफ डू प्लेसीने ५३ चेंडूत ८७ आणि शेन वॉटसनने ५३ चेंडूत ८३ धावांची नाबाद खेळी खेळली. ही चेन्नई सुपर किंग्ज संघाची देखील सर्वात मोठी भागीदारी आहे.
१. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात लायन्स – २०१७ (गौतम गंभीर – ख्रिस लिन)
२०१७ च्या आयपीएल हंगामात केकेआरने गुजरात लायन्सचा १० गडी राखून पराभव केला. सुरेश रैनाच्या नेतृत्वात गुजरात लायन्सने प्रथम फलंदाजी करत १८३ धावा केल्या. यामध्ये सुरेश रैनाने नाबाद ६८ धावांची खेळी केली होती.
टी-२० क्रिकेटमध्ये १८४ ही धावसंख्या खूप मोठी असते, पण कोलकाता नाईट रायडर्सने एकही विकेट न गमावता ती धावसंख्या गाठली. केकेआरसाठी त्यांच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी १८४ धावांची नाबाद भागीदारी करत आपल्या संघाला १४.५ षटकांत लक्ष्यपर्यंत नेले. कोलकाताकडून सलामीवीर ख्रिस लिनने ४१ चेंडूत नाबाद ९३ आणि गौतम गंभीरने ४८ चेंडूत नाबाद ७६ धावा केल्या होत्या.