वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने मैदानात खळबळ उडवून दिली. भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afganistan) यांच्यातील अंडर-19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये त्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
जेव्हा प्रतिस्पर्धी संघाने 300 हून अधिक धावांचे विशाल लक्ष्य दिले होते, तेव्हा भारताला अशाच धडाकेबाज सुरुवातीची गरज होती. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 50 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 310 धावा केल्या. अंडर-19 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतासमोर पहिल्यांदाच एखाद्या संघाने 300 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा केला आहे.
विजयासाठी 311 धावांचे लक्ष्य असताना वैभवने केवळ 33 चेंडूंत 68 धावा केल्या. यात त्याने 9 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट 206.06 इतका जबरदस्त होता. जेव्हा भारताची पहिली विकेट पडली, तेव्हा 10 व्या षटकात स्कोअर 90 धावा होता. विशेष म्हणजे या 90 पैकी 68 धावा एकट्या वैभवच्या होत्या. दुसरा सलामीवीर एरॉन जार्जनेही त्याला चांगली साथ दिली.
वैभव जोपर्यंत मैदानात होता, तोपर्यंत हे लक्ष्य सोपे वाटत होते. पण अर्धशतकानंतर त्याचे रूपांतर शतकात करण्याच्या नादात तो आक्रमक शॉट खेळताना बाद झाला. मोठी सुरुवात मिळाल्यावर तिचं मोठ्या डावात रूपांतर न होणं, ही वैभवची जुनी समस्या पुन्हा एकदा दिसून आली.
भारताने 100 धावांचा टप्पा ओलांडला असून सामना अजूनही सुरू आहे. आता सर्वांच्या नजरा कर्णधार आयुषवर आहेत. 311 धावांचे हे ऐतिहासिक लक्ष्य गाठून भारतीय संघ फायनल गाठणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






