भारतीय संघाचा १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार प्रियाम गर्गच्या मते, मोहम्मद कैफ हाच भारताचा आजपर्यंतचा १९ वर्षाखालील संघाचा सर्वोत्तम कर्णधार आहे. तो हॅलो एपवरील एका लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता.
प्रियामच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषकात २०२०मध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती, परंतु संघाला अंतिम फेरीत बांगलादेशकडून पराभव स्विकारावा लागला होता.
२०००, २००८, २०१२ व २०१८ असे चार १९ वर्षाखालील विश्वचषक भारताने अनुक्रमे मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद व पृथ्वी शाॅ यांच्या नेतृत्त्वाखाली जिंकले आहेत. तर २००६ ला रविकांत शुक्ला व २०२०मध्ये प्रियाम गर्गच्या नेतृत्त्वाखाली भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
विश्वचषक जिंकणाऱ्या या ४ कर्णधारांपैकी उन्मुक्त चंदला मात्र एकही आंतरराष्ट्रीय सामन्यात आजपर्यंत संधी मिळाली नाही.
मोहम्मद कैफच्या नेतृत्वाचे यावेळी हॅलो एपवरील या लाईव्ह सेशनमध्ये प्रियामने कौतूक केले. गमतीचा भाग म्हणजे जेव्हा भारताने कैफच्या नेतृत्त्वाखाली १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता त्यानंतर १० महिन्यांनी प्रियामचा जन्म धाला होता.
प्रियाम उत्तरप्रदेशकडून १२ प्रथम श्रेणी, १९ अ दर्जाचे व ११ टी२० सामने खेळला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ६६.६९च्या सरासरीने ८६७ धावा केल्या आहे. बरोबर १९ वर्ष व १६७ दिवस वय असलेला हा खेळाडू भारतीय संघात स्थान मिळण्याची सध्या वाट पहात आहे.