नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक (u19 world cup 2022) स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी जेतेपद पटकावले. ही पाचवी वेळ आहे, जेव्हा भारताने १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे. यानंतर भारतीय संघातील युवा खेळाडू यश धूल, राजवर्धन हंगारगेकर, राज बावा, विकी ओस्तवाल अशी नावे सर्वत्र चर्चेत आहेत. त्यांचे भविष्य उज्वल सांगितले जात आहे. परंतु, असे काही खेळाडू होऊन गेले आहेत, ज्यांनी १९ वर्षाखालील संघासोबत चांगले प्रदर्शन केले होते. पण पुढे त्यांना अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत आणि त्यांंचे नाव कुठेच दिसत नाही. भारताचे कमल पासी (kamal passi) आणि कंवर विर्दी (kanwar virdi) हे अशाच खेळाडूंमध्ये येतात.
भारतासाठी २०१२ मधील १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणाऱ्या संघात कमल पासीचा सहभाग होता. त्याने या स्पर्धेत संघासाठी १० विकेट्स घेतल्या होत्या. झिम्बाब्वेविरूद्ध एका सामन्यात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत त्याने २३ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच कंवर विर्दी यांनी भारतासाठी १९८८ मधील १९ वर्षाखालील विश्वचषक खेळला होता. विर्दी या विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रमुख गोलंदाज होते. त्या विश्वचषक स्पर्धेत ब्रायन लारा, सनथ जयसूर्या, माइक आथर्टन, नासिर हुसेन यांसारखे दिग्गज सहभागी होते.
कमल पासीची कहानी
कमल पासी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि सर्विसेस संघासाठी खेळला आहे. परंतु त्याला फक्त चार प्रथम श्रेणी आणि एक लिस्ट ए सामना खेळण्याची संधी मिळाली. २०१५ मध्ये तो नेव्हीमध्ये दाखल झाला आणि सर्विसेस संघासाठी खेळला. परंतु त्यानंतर तो पुन्हा एकदा पंजाबमध्ये गेला आणि २०१६-१७ हंगामात पंजाबचे प्रतिनिधित्व केले. त्यावर्षी त्याला केवळ दोन प्रथम श्रेणी सामने खेळण्याची संधी दिली गेली. कमल पासी त्यानंतर आजही पंजाब संघात सामील होण्यासाठी संधी शोधत आहे, पण दरम्यानच्या काळात त्याला एकही संधी मिळाली नाहीये.
कमल पासीच्या म्हणण्याप्रमाणे त्याला क्रिकेटमध्ये अपेक्षित संधी न मिळण्यासाठी केवळ पंजाब क्रिकेट असोसिएशन कारणीभूत आहे. त्याच्या मते बोर्डकडून त्याच्या सावत्रपणाची वागणूक मिळाली आहे. तो सध्या पंजाबमध्ये जीएसटी विभागात कार्यरत आहेत.
कंवर विर्दीसोबत काय घडले ?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणा संघासाठी खेळलेल्या कंवर विर्दी यांची कारकिर्द दुखापतीमुळे खुपच लवकर संपली. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सात सामने खेळले आहेत. विर्दींनी १९८८ च्या १९ वर्षाखालल विश्वचषकात पाकिस्तानच्या इंजमाम उल हकची विकेट घेतली होती. तसेच त्यानंतर जुल्फिकार बटलाही त्याने तंबूत पाठवले होते. पाकिस्तानचे तत्कालील मुख्य प्रशिक्षक वसीम राजा यांनी त्यावेळी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये येऊन विर्दीचे कौतुक केले होते.
कंवर विर्दी यांना १९८९ मध्ये विल्स ट्रॉफीसाठी बोर्ड प्रेसीटेंड इलेव्हनमध्ये सामील केले गेले होते. तसेच वर्षाच्या शेवटी पाकिस्तान दौऱ्यासाठीही त्याची निवड झाली होती. परंतु त्याच्या जागी सलिल अंकोलाला निवडले गेले. माजी दिग्गज सुनिल गावसकरही त्यांच्या गोलंदाजीमुळे प्रभावित झाले होते. त्यांनी विर्दी यांना मुंबईत भेटण्यासाठी बोलवले होते. परंतु आर्थिक चणचणीमुळे विर्दी मुंबईत जाऊ शकले नव्हते. त्यानंतर डेनिस लिलींची त्यांच्यावर नजर पडली आणि त्यांना एमआरएफ पेस फाउंडेशनवर नियुक्त केले गेले. परंतु दुखापतीमुळे त्याची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली.
कंवर विर्दी यांनी नंतर १९९३ साली रेल्वमध्ये टीटीची नोकरी लागली. २०१९ मध्ये जेव्हा चंदीगढला बीसीसीआयची मान्यता मिळाली, तेव्हा विर्दी पुन्हा एकदा क्रिकेटशी जोडले गेले. ते चंदीगढच्या १९ वर्षाखालील संघाचे निवडकर्ते बनलै होते. सध्या ते महिला संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी पार पाडत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकन महिला क्रिकेटपटूने टिपला जॉंटी रोड्स स्टाईल एकहाती झेल, पाहा व्हिडिओ
कारकीर्द वाचवण्यासाठी पुजाराने घेतला मोठा निर्णय! वाचा सविस्तर
युवा विश्वचषकात चमकदार कामगिरीनंतरही भारताचा ‘हा’ खेळाडू नाही आयपीएल लिलावाचा भाग, वाचा कारण