क्रिकेटमध्ये जेव्हा खेळाडूंकडून मैदानावरील पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधार डीआरएसची मागणी केली जाते, त्यावेळी ‘अंपायर्स कॉल’ हा महत्त्वाचा मुद्दा असतो. मात्र, मागील अनेक दिवसांपासून ‘अंपायर्स कॉल’ या नियमाबद्दल चर्चा होत आहे. तसेच या नियमावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी टीकाही केली आहे. आता याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आयसीसीने गुरुवारी (१ एप्रिल) स्पष्ट केले आहे की ‘अंपायर्स कॉल’ डीआरएसचा भाग म्हणून कायम राहिल. असे असले तरी आयसीसीने डीआरएसच्या काही नियमांमध्ये मात्र बदल केले आहेत.
आयसीसीने बुधवारी झालेल्या बैठकीनंतर प्रसिद्धीपत्रक जाहीर केले. त्या प्रसिद्धीपत्रकानुसार आयसीसीच्या क्रिकेट समीतीचा प्रमुख आणि भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेने म्हटले आहे की ‘अंपायर्स कॉलबद्दल बरीच चर्चा झाली. तसेच त्याच्या वापराबद्दलही विस्तृत चर्चा करण्यात आली. डीआरएसमुळे सामन्यादरम्यानच्या स्पष्ट चुका दुरुस्त करता येतात. तसेच हे देखील लक्षात घेतले पाहिजे की मैदानावरील निर्णय घेताना पंचांची भूमिका अबाधित राहील. अंपायर्स कॉलची हीच भूमीका आहे. त्याचमुळे अंपायर्स कॉल कायम राहाणे महत्त्वाचे आहे.’
आयसीसीने केले ३ बदल
अंपायर्स कॉल कायम करण्याचा जरी आयसीसीने निर्णय घेतला असला, तरी डीआरएस आणि तिसऱ्या पंचांशी जोडलेल्या ३ नियमांमध्ये थोडे बदल केले आहेत. आयसीसीच्या म्हणण्यानुसार ‘पायचीतच्या रिव्ह्यूसाठी विकेट झोनची उंची वाढवून स्टंपच्या शिखरापर्यंत वाढवण्यात आली आहे. जेणेकरुन हे सुनिश्चित होईल की स्टंपच्या आसपासची उंची आणि रुंदी अंपायर्स कॉलसाठी सारखी असेल.’
म्हणजेच आता रिव्ह्यूमध्ये स्टंपच्या बेल्सपर्यंतची उंची मोजली जाईल, यापूर्वी बेल्सच्या खालच्या बाजूपर्यंतच उंची मोजली जायची.
याबरोबरच आता पायचीतसाठी रिव्ह्यू घेण्याआधी खेळाडू पंचांना फलंदाजाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे की नाही, हे विचारु शकतात. तसेच तिसरे पंच शॉर्ट रन आहे की नाही हे रिप्लेमध्ये तपासू शकतात आणि चूक झाल्यास पुढचा चेंडू फेकण्यापूर्वी ते दुरुस्त करु शकतात.
याशिवाय आयसीसीने कोविड-१९ साठी मागीलवर्षी केलेले नियमही यंदा कायम केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला! टी नटराजनला मिळाली थार, त्यानेही पाठवले ‘हे’ खास रिटर्न गिफ्ट
“आम्ही २०११ चा विश्वचषक जिंकून कोणावर उपकार केले नाहीत”, गौतम गंभीरचे खळबळजनक भाष्य
IPL 2021: ‘या’ कारणांमुळे मुंबई इंडियन्स सलग तिसऱ्यांदा आयपीएल विजेता होण्यात ठरु शकतो अपयशी